नांदेडमध्ये २०वे विद्रोही साहित्य संमेलन:अध्यक्षपदी कवी लोकनाथ यशवंत, तर डॉ. बजरंग बिहारी तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन




नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या भव्य मैदानावर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन दिल्लीतील हिंदीचे सुप्रसिद्ध लेखक व समीक्षक डॉ. बजरंग बिहारी तिवारी यांच्या हस्ते होणार आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत (नागपूर) हे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. विद्रोही संस्कृती चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी आणि २०व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल एस एम प्रधान यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. बजरंग बिहारी तिवारी हे विविध भाषांमधील भक्ती साहित्य आणि आंदोलन, नवजागरण काळातील साहित्य, शेतकरी व दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य आणि समीक्षा तसेच समकालीन संस्कृत साहित्य या विषयांचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. हिंदी पट्ट्यातील राजकारण, भाषा आणि राष्ट्रवाद, साहित्य आणि सामाजिक न्याय या विषयांतून त्यांनी राजकारण व सांस्कृतिक घडामोडींमधील सहसंबंध उलगडून दाखवले आहेत. तुलनात्मक भाषा व संस्कृती अभ्यासाचे तज्ञ असणाऱ्या डॉ. तिवारी यांच्या अनेक लेखांचा भारतातील मराठी, बंगाली, तेलुगू इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. ते सध्या दिल्ली विद्यापीठातील देशबंधू महाविद्यालयात हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दिल्ली येथे १३ महिने चाललेल्या शेतकरी आंदोलनाशी त्यांचा निकटचा संबंध होता. याच काळात त्यांनी ‘भक्ती कविता किसानी और किसान आंदोलन’ आणि ‘किसान आंदोलन और दलित कविता’ अशी शेतकरी आंदोलनाशी संबंधित दोन पुस्तके लिहिली आहेत. भारतातील जातीव्यवस्था आणि साहित्य हे त्यांच्या दीर्घकालीन चिंतनाचे विषय राहिले आहेत. ‘जाती आणि लोकशाही: दलित शोषणाच्या संदर्भात’, ‘दलित साहित्य एक अंतर्यात्रा’, ‘भारतीय दलित साहित्य आंदोलन आणि चिंतन’, ‘बंगाली दलित साहित्य सम्यक अनुशीलन’, ‘केरळमधील सामाजिक आंदोलन आणि दलित साहित्य’ (मराठी भाषांतर डॉ. अरविंद सुरवाडे) हे त्यांचे दलित साहित्य संदर्भातील ग्रंथ हिंदी जगतात महत्त्वपूर्ण ठरले आहेत. जातीभेदाबरोबरच स्त्रीवादाबद्दलही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. म्हणूनच ‘दलित स्त्री लेखन आणि आंदोलन’ या स्वतंत्र पुस्तकाबरोबरच ‘दलित स्त्री जीवन आणि कथा’, ‘दलित स्त्री जीवन आणि कविता’, ‘दलित स्त्री जीवन आणि समीक्षा’ या तीन ग्रंथांच्या संपादनात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. पंजाबमधील दलित साहित्य आणि समकालीन संस्कृत साहित्यातील जीवनवाद इत्यादी लेखांद्वारे ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत. मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि हिंदी अशा पाच भाषातील जीवनवादी व जनवादी साहित्य व समीक्षे संदर्भात त्यांच्या कामगिरी बद्दल त्यांना साहित्याच्या प्रांतात ओळखले जाते. भारतीय साहित्य एक परिचय (संपादित) व कविता एक भावयात्रा यांसह त्यांचे एकंदर आठ समीक्षा ग्रंथ, चार संपादित ग्रंथ व व हिंदीतील कथादेश आलोचना इत्यादी अग्रगण्य नियतकालिकांमध्ये अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks