![]()
हिंगोली जिल्ह्यात पोलीस भरतीची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू असून, यासाठी राज्यभरातील हजारो तरुण हिंगोलीत दाखल झाल्यानंतर त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी सोमवारी ता १६ या उमेदवारांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली. मागच्या दिवसापासून हा उपक्रम सुरू आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पोलीस प्रशासनाच्या नियोजनानुसार उमेदवार भरतीसाठी दाखल होऊ लागले आहेत. मात्र अनेक ठिकाणी भरतीसाठी आलेल्या युवकांना राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे उमेदवार मिळेल त्या ठिकाणी रात्र जागून काढत असल्याचे चित्र आहे. याशिवाय उमेदवारांच्या भोजनाची देखील पुरेशा प्रमाणात व्यवस्था होत नाही. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. मात्र हिंगोली येथे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आमदार संतोष बांगर यांनी मदतीचा हात दिला आहे. हिंगोली येथे देखील पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी दररोज साडेसातशे ते नऊशे उमेदवारांना बोलावले जात आहे. या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार संतोष बांगर यांच्या वतीने हिंगोलीत मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील चार दिवसां पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था हिंगोलीच्या महावीर भवन येथे करण्यात आली आहे.आज या व्यवस्थेची आमदार संतोष बांगर यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक श्रीराम बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, नगरसेवक गुड्डू भैया बांगर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी उमेदवारांसोबत जमिनीवर पंगतीत बसून भोजनाचा आनंद घेतला. आमदारांच्या या साधेपणाने आणि आपुलकीने उपस्थित तरुण भारावून गेले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारत आमदारांनी तरुणांचा उत्साह वाढवला आणि त्यांना भरतीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार बांगर यांनी केलेल्या या सुविधेमुळे उमेदवारांची मोठी सोय झाली आहे.
हिंगोलीत पोलिस भरतीसाठी आलेल्यांना मोठा आधार:मोफत निवास व भोजनाची चोख व्यवस्था, आमदार संतोष बांगर यांचा पुढाकार
