अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी उमेश गाड यांची निवड:गोव्याचे ज्येष्ठ लेखक अध्यक्ष; पिंपरी चिंचवडमध्ये 18वे संमेलन




पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या १८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गोव्याचे ज्येष्ठ लेखक, संशोधक उमेश गाड यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्य मंडळातर्फे महात्मा फुले महाविद्यालयात हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. उमेश गाड हे गोव्याचे स्वातंत्र्यसैनिक शंकर गाड यांचे सुपुत्र आहेत. मराठी भाषा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि मराठी भाषेची गोडी वाढावी यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रांतून ते स्फूट लेखन करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गोमंतक साहित्य सेवक मंडळाचा आदर्श पत्रकार पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर कर्मयोगी पुरस्कार, मराठी साहित्य मंडळाचा आदर्श पुरस्कार तसेच महात्मा गांधी प्रेरणा पुरस्कार अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. सध्या ते गोवा लढा स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघ (कराड), स्वामी विवेकानंद संस्था (पेडणे), पेडणे उच्च माध्यमिक विद्यालय, संत सोहिरोबानाथ आंबीये कला व वाणिज्य महाविद्यालय (वळपे-पेडणे), म्हालची पांढर कला व सांस्कृतिक संस्था, दत्तगुरु कला व सांस्कृतिक संस्था तसेच उत्तर गोवा पत्रकार संघ अशा विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गोवा राज्यात मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. या संमेलनाचे उद्घाटन पणजी, गोवा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांच्या हस्ते होणार आहे. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, अॅड. राम कांडगे (उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था सातारा), डॉ. जयप्रकाश घुमटकर (कवी गोलघुमट), ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे (नाशिक), कवी सुरेश लोहार (कराड), डॉ. संजय मेस्त्री (रत्नागिरी) व डॉ. विनायकराव जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात “आजही दलित साहित्य उपेक्षित का?” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. निता बोडके राहतील, तर डॉ. प्रवीण उपलेंचवार (नागपूर) व बापूसाहेब पाटील-ठाकरे (जळगाव) हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. याव्यतिरिक्त, काव्यस्पर्धा व काव्यसंमेलनालाही नामवंत कवींची उपस्थिती लाभणार असून, साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *