NCP Merger Update; Hiraman Khoskar Claims 30-35 MLAs Support After Sunetra Pawar Oath


अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच राष्ट्रवादीच्या 30 ते 35 आमदारांनी विलीनीकरणाच्या बाजूने मत व्यक्त केले होते, असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर य

.

अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामु्ळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील विलीनीकरणाची कथित चर्चा थंड बस्त्यात पडली आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार या चर्चेला हवा दिली जात आहे. पण अजित पवार गटाच्या सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेलांसारख्या नेत्यांकडून सातत्याने विलीनीकरणाची चर्चा धुडकावून लावली जात आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या पक्षाच्या बहुतांश आमदारांचा विलीनीकरणाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे.

सुनेत्रा पवारांच्या शपथविधी दिवशीच चर्चा झाली होती

इगतपुरीचे हिरामण खोसकर शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण 100 टक्के झाले पाहिजे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आपला नेता गेला, आपला लीडर गेला अशी भावना असेल. विशेषतः नेत्याला खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर विलीनीकरण झालेच पाहिजे. तसे झाले तर आम्हाला आनंदच होईल. सुनेत्रा पवार या आमच्या गॉडफादर आहेत. त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.

सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याच दिवशी पक्षाचे 40 पैकी 30 ते 35 आमदार विलीनीकरणाच्या बाजूने होते. त्यांच्यात तशी चर्चाही झाली होती. मंत्री मकरंद पाटील यांनी तर स्पष्टच सांगितले. सुनेत्रा पवारांनी मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यात मी विलीनीकरण व्हावे अशी स्पष्ट भूमिका मांडणार आहे, असे ते म्हणाले.

विलीनीकरणाची चर्चा कानावर आली होती

हिरामण खोसकर यांनी यावेळी आपली शरद पवारांच्या गटातील नेत्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचाही दावा केला. माझी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांशी कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील हे ही अनुभवी नेते आहेत बाळासाहेब पाटील आहेत. राजेश टोपे आहेत. त्यामुळे विलीनीकरण झाले तर आम्हालाच मोठा दिलासा मिळेल. ही चांगली गोष्ट होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरण होणार ही चर्चा आमच्याही कानावर आली होती. दादांनी आम्हाला ते सांगितले नव्हते. पण विलीनीकरण होणार हे आम्हाला 100 टक्के माहिती होते, असेही खोसकर यावेळी बोलताना म्हणाले.

विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार सर्वेसर्वा असाव्यात

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले तर सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असाव्यात असेही हिरामण खोसकर यांनी यावेळी स्पष्ट् केले. विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याची बाब आमच्या कानावर येत होती. पण आता विलीनीकरण झाले तर सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असाव्यात. शरद पवारांनी त्यांना पाठिंबा द्यावा. शशिकांत शिंदे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाविषयी जे काही बोलत आहेत ते 100 टक्के खरे आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले तर सर्वांनाच दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.

हे ही वाचा…

विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार करणार होते:शरद पवार गटाचा सर्वात मोठा दावा; कार्यकर्त्यांना मन मोठे करण्याचे आवाहन

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा पोपट मेल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही गटांच्या विलीनीकरणानंतर आम्ही पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवारांकडे सोपवणार होतो, असा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *