![]()
कोळवाडी आणि सितानाईक तांडा येथील रंजना काळे आणि संगीता जाधव या उमेद योजनेअंतर्गत २०१६ पासून काम करत होत्या. २०१६ ते २०१८ या काळात त्यांच्याकडून विनामोबदला काम करून घेतले. २०१८ पासून त्यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र २०२२ पासून कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतरचे मानधनही देण्यात आलेले नाही. या महिलांना पुन्हा कामावर घ्यावे आणि थकीत वेतन द्यावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने बुधवारपासून (दि.११) कन्नड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, इंदिरा आवास योजना, बांधकाम कामगार घरकुल योजना, रमाई घरकुल योजना आणि शबरी माता घरकुल योजनांची माहिती, शासकीय परिपत्रके, आदेश आणि अंमलबजावणी याबाबत माहिती द्यावी. श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थी निवड आणि शासन निर्णय याची माहितीही द्यावी, आदी मागण्यांसाठी अशोक पवार, आलमदार जाफरी, गीताराम व्होलप, ज्ञानेश्वर थोरात, त्र्यंबक भवर, रामचंद्र सोनवणे आदी उपोषण करीत आहेत.
शेतकऱ्यांना अनुदान देण्यासह विविध मागण्यांसाठी कन्नडमध्ये उपोषण सुरू
