![]()
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला त्याच्या एका साथीदारासह बिहारमधील पाटणा येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भिवंडी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही फिल्मी स्टाइल धाडसी कारवाई केली.
.
या २ नव्या अटकेमुळे या गुन्ह्यात गजाआड झालेल्यांची एकूण संख्या आता १४ झाली आहे. भिवंडी परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी विजयेंद्रकुमार ऊर्फ बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याचा साथीदार इंद्रजित सिंह यांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी पुण्यात आणि त्यानंतर पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणण्यात आले. २८ जून रोजी राज्यभरातील १ हजार २८ केंद्रांवर टीईटीची परीक्षा होणार होती. मात्र, तत्पूर्वीच २७ जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी डमी ग्राहक बनून छापा टाकला. त्यात जप्त केलेल्या प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्याने परीक्षा पुढे ढकलत एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.
नॉलेज : अटकेतील आरोपींची संख्या १४ वर, १२ कोठडीत : २७ जून २०२६ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. दोघांच्या अटकेमुळे आतापर्यंत अटक केलेल्या १४ आरोपींमध्ये बिहार, उत्तर प्रदेश व अन्य राज्यांतील सदस्यांचा समावेश आहे. १२ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. यात आग्रा येथील छापखान्यातील ३ कर्मचारी (नरेशकुमार, संजयकुमार, बाबूलाल) आणि मुख्य आरोपीची पत्नी सुमन कुमारी हिचाही समावेश आहे.
छापखान्यातून बुटात लपवून पेपर बाहेर
मुख्य आरोपीने आग्रा येथील एका खासगी छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैसे व मालमत्तेचे आमिष दाखवले. छापखान्यातील या कर्मचाऱ्यांनी अत्यंत गोपनीय असलेला हा पेपर चक्क बुटात लपवून बाहेर काढला होता.
