![]()
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी अत्यंत घाईगडबडीत उरकण्यात आला. आता याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या 2 बड्या मंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शपथविधी लवकर कुणी करायला लावला? दुःखद घटनेनंतर लवकर शपथविधी लोकांना फारसे आवडले नाही, असे या मंत्र्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून या घटनेविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेषतः अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांच्या उरकण्यात आलेल्या शपथविधीवरही वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत व मंत्री संजय शिरसाट यांनी वरील विधान केले आहे. शपथविधी लवकर कुणी करायला लावला? -उदय सामंत मंत्री उदय सामंत याविषयी बोलताना म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री झाल्यामुळे कुणाला वाईट वाटेल असे अजिबात नाही. पण हे इतक्या लवकर का झाले? कुणी करायला लावले? मग हे कुणी घडवून आणले आहे का? अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही. पण तुम्ही सोशल मीडियावर गेलात किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी बघताना तुम्ही त्या खाली येणाऱ्या कमेंट्स वाचल्या, तर त्यातून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील शंका दिसून येतात. त्याच्यात कुणी काय म्हणाले? यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या याचे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून समाधान आहे. त्या अजित पवारांचा वारसा नक्की पुढे घेऊन जातील असा मला विश्वासही आहे, असे उदय सामंत म्हणाले. सुनेत्रा पवारांचा शपथविधी लोकांना आवडला नाही – संजय शिरसाट दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांनीही सुनेत्रा पवारांचा घाईगडबडीत उरकलेला शपथविधी लोकांना आवडला नसल्याचा दावा केला आहे. ते आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अजित पवारांच्या दुःखद घटनेनंतर लवकर शपथविधी होणे हे सर्वसामान्य माणसांना आवडले नाही. म्हणून मी त्यावेळी माझी भावना व्यक्त केली. ही लोकभावना आहे. मी ती मांडली. या प्रकरणी कुणाचा गैरसमज होत असेल तर त्याविषयी मला काही देणेघेणे नाही. पण ज्याला जनभावना म्हणतात ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे ते म्हणालेत. शरद पवार 2022 मध्येच एनडीएत येणार होते संजय शिरसाट यांनी यावेळी शरद पवार 2022 मध्येच एनडीएत येणार होते असाही दावा केला होता. शरद पवारांनी 2022 मध्ये एनडीएत येण्याचा प्रयत्न केला होता. या गोष्टी नाकारता येणार नाहीत. त्यावेळी कोणती खाती घ्यायची व कोणती खाती नकोत यावर सगळी चर्चा झाली होती. हे सगळे त्या काळात ठरले होते. त्यानंतर मधल्या काळात त्यांच्या चर्चा झाल्या झाल्या आहेत की नाही हे मला माहिती नाही. या प्रकरणी शरद पवार जोपर्यंत भाष्य करत नाही, तोपर्यंत भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी लवकर का उरकला?:शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सवाल; म्हणाले – दुःखद घटनेनंतरचा शपथविधी लोकांना आवडला नाही
