![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे. त्यांना जाऊन विचार मी कोण आहे? मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो तर काय होते ते विट्यात जाऊन पाहा, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराचा धुरळा सुरू आहे. त्यात भाजप व शिवसेना या सत्ताधारी पक्षांतच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. खानापूर तालुक्यात भाजपच्या काही नेत्यांनी विशेषतः विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला बाबर यांनी करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी गावातील प्रचारसभेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, सुहास बाबर खानापूर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, अजित पवार गट, शिंदे गट, ठाकरे गट व भाजपही चालवतो. मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो, तर विट्यात मी काय केले हे माहिती आहे. सुहास बाबर यांच्या या विधानामुळे भाजप व शिंदे गटातील कथित राजकीय वैमनस्य वाढण्याची शक्यता आहे. प्रभाकर पाटलांचा अर्ज मागे दुसरीकडे, सांगलीच्या तासगावात जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी घडामोड घडली आहे. तासगावच्या चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी माघार घेतली आहे. प्रभाकर पाटलांनी चिंचणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल केली होती. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले. या ठिकाणी प्रभाकर पाटील यांच्या विरोधात त्यांचे नातलग अक्षय पाटील शरद पवार गटाकडून मैदानात उतरलेत. अक्षय पाटील यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रभाकर पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. एकनाथ शिंदेंचा वाळव्याच्या विकासाचा शब्द दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच वाळवा तालुक्यात प्रचारसभा घेतली होती. त्यात त्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत. त्यामुळे वाळव्यात पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण व महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाईल, असे ते म्हणाले होते.
मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो तर…:शिंदे गटाच्या आमदाराचा भाजप नेत्यांना इशारा; ZP निवडणुकीचा प्रचार टोकाला
