अजितदादा पवार यांचे निधन, जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली:बारामती विमान अपघातानंतर अमरावतीत शोकसभा आयोजित




उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात आला असून, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळून मृतात्म्यास शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अजितदादा पवार हे शिस्तीप्रिय आणि वक्तशीर होते, असे सांगितले. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील आणि प्रशासनातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी तातडीने निर्णय घेतले होते. शासनाने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या राजकीय दुखवट्यामुळे कार्यालयातील सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या शोकसभा प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधीक्षक निलेश खटके आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *