मालट्रक पहाटे उलटला; वाहतूक मात्र सायंकाळपर्यंत कोलमडली:दुभाजकावर चढून रस्त्यातच कोसळला अवजड मालट्रक
![]()
महामार्गावर मक्याच्या दाण्यांचा सडा, गोण्यांचा खच आणि दिवसभर कर्णकर्कश हॉर्नचा आवाज… हे चित्र होते अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल अक्षय पॅलेस ते इंद्रायणी परिसरातील. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मका वाहून नेणारा ट्रक (एमएच २१ एक्स ८९११) दुभाजकाला धडकून उलटल्याने भीषण भीषण अपघात झाला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्थाच कोलमडली. पहाटे अपघात होऊनही दुपारपर्यंत दुभाजकावर चढलेला ट्रक एका बाजूला कोलमडून पडलेला होता. आश्चर्य म्हणजे, १२ तास उलटले तरी प्रशासनाला एक क्रेन आणून तो बाजूला घेता आला नाही. शेंडी बायपासवर नावापुरते पोलिस तैनात होते, पण त्यांच्या डोळ्यांदेखत बंदी असतानाही अवजड ट्रेलर आणि कंटेनर शहरात घुसत होते. जणू काही नियमांची पाटी फक्त सामान्यांसाठीच आहे.बेशिस्तपणाचा कळस म्हणजे, तासनतास अडकलेल्या काही चालकांनी विरुद्ध दिशेने गाड्या घुसवल्या. त्यामुळे अधिक कोंडी निर्माण झाली. तवलेनगर फाट्यापासून वारुळवाडीपर्यंत ३ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे रस्ता आधीच अरुंद झाला आहे. त्यात या अपघाताने भर टाकली. वाहनांची रहदारी अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत होती. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे आपल्या टीमसह घामाघूम होऊन रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत होते. पण व्यवस्थेचा ढिसाळपणा आणि बेशिस्त चालकांपुढे त्यांचेही प्रयत्न तोकडे पडले. नंदलाल बिद्रे, वाहनचालक. हजारो प्रवाशांचा खोळंबा अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावरून दिवसभरात साधारण १० ते १२ हजार वाहनांची ये-जा असते. मात्र, तासनतास चाललेल्या या वाहतूक कोंडीमुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. रुग्णवाहिकांपासून ते नोकरदारांपर्यंत प्रत्येकजण तासन्तास अडकून पडला, ज्यामुळे इंधनाचा अपव्यय आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला. १७ तास यंत्रणा सुस्त बुधवारी पहाटे अपघात झाला, पण सायंकाळी ७ वाजेपर्यंत अपघातग्रस्त वाहन तसूभरही हलले नव्हते. क्रेन पाचारण करण्यात झालेली दिरंगाई प्रवाशांच्या जीवावर बेतली. सायंकाळी दुसऱ्या ट्रकमध्ये मक्याच्या गोण्या भरण्याचे काम सुरु होते. या ढिसाळ नियोजनाला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे.
