![]()
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या रणधुमाळीत काल दिवसभर सुरू असलेला ‘नॉट रिचेबल’चा सस्पेन्स अखेर मध्यरात्री संपला आहे. प्रभाग १५७ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. मध्यरात्री त्या आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या असून, आज त्या मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. काल सकाळी शिवसेना भवन येथे बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर होत्या. इतकेच नव्हे तर कोकण भवन येथे पक्षाचा ‘गट’ नोंदवण्यासाठी सर्व नगरसेवक गेले असतानाही म्हस्के तिथे पोहोचल्या नव्हत्या. त्यांचा फोन बंद असल्याने त्या शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच तिथे प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मुंबईत ६५ नगरसेवक निवडून आलेल्या ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. नार्वेकरांच्या निवासस्थानी ‘मध्यरात्री’ एन्ट्री ठाकरे गटाचे संकटमोचक मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी या प्रकरणात तात्काळ मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मध्यरात्री डॉ. म्हस्के नार्वेकरांच्या निवासस्थानी पोहोचल्या. “नेमकं काय घडलं होतं आणि त्या का संपर्काबाहेर होत्या?” याचे स्पष्टीकरण त्या स्वतःच देणार आहेत. आज सकाळी ११ वाजता मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्या ‘मातोश्री’वर जाणार असून, तिथे उद्धव ठाकरेंशी संवाद साधल्यानंतर त्या कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी रवाना होतील. कोण आहेत डॉ. सरिता म्हस्के? डॉ. सरिता म्हस्के यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आणि संघर्षाचा राहिला आहे. त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र अवघ्या ४०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०२५ च्या सुरुवातीला त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या होत्या. महायुतीच्या जागावाटपात प्रभाग १५७ ची जागा भाजपने स्वतःकडे ठेवल्याने म्हस्के यांनी बंडाचे निशाण फडकवत शिंदेंची साथ सोडली आणि ‘मातोश्री’वर जाऊन मशाल हाती घेतली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या अनुभवी उमेदवार आकांक्षा शेट्टे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. सत्तास्थापनेच्या आकडेमोडीत महत्त्व मुंबईत भाजप आणि शिंदे गटात महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असताना, प्रत्येक नगरसेवकाचे मत महत्त्वाचे ठरत आहे. अशा परिस्थितीत आपल्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. सरिता म्हस्के यांच्या परतण्याने ठाकरे गटाचे संख्याबळ पुन्हा भक्कम झाले असून, आता सर्व नगरसेवकांची गट नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईत ठाकरेंना मोठा दिलासा!:काल दिवसभर 'नॉट रिचेबल' नगरसेविका मध्यरात्री स्वगृही; मिलिंद नार्वेकरांच्या मध्यस्थीने 'नाट्य' संपले
