![]()
माढा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी धावपळ आणि राजकीय चढाओढ पाहायला मिळाली. अनेक उमेदवारांनी अर्ज भरले तर काहींनी बंडखोरीचे निशाण फडकावले. मात्र या सर्व गर्दीत मानेगाव जिल्हा परिषद गटातील शेतकरी पुत्र विश्वजीत पाटील यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेतीमालाच्या दराबाबतची व्यथा मांडण्यासाठी गळ्यात चक्क कांद्याची माळ घालून ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले, त्यांच्या या अनोख्या आंदोलनात्मक उमेदवारीची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. एका वृत्तवाहिनीला बोलताना उमेदवार विश्वजीत पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. गेल्या 10 वर्षांपासून एकट्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई लढत असताना कोणाचीही साथ न मिळाल्याची खंत व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. कांदा हे शेतकऱ्यांचे खरे आभूषण आहे, असे सांगत त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सध्याच्या विदारक स्थितीकडे लक्ष वेधले. बँकांकडून कर्ज मिळण्यात होणाऱ्या अडचणी आणि वाढत्या शेतकरी आत्महत्या या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही लढाई असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. विश्वजीत पाटील म्हणाले, अनेक शेतकरी कर्ज काढून शेती करत आहेत. वरांवराव दुष्काळ पडतो, कधी पूर येतो, यामुळं जमिनीची मोठ्या प्रमामात नुकसान होत आहे. अशा काळात सरकार मात्र तुटपुंजी मदत करत आहे. अनेक शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. मात्र, चांगली मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सोने हे धनवानांचे आभूषण असेल, पण माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यासाठी घाम गाळून पिकवलेला कांदाच श्रेष्ठ आभूषण आहे, अशी भावना विश्वजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. माढा तालुक्यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या या अनोख्या प्रयोगाने सर्वांचे लक्ष वेधले असून, एका संघर्षशील शेतकऱ्याची व्यथा त्यांनी या माध्यमातून चव्हाट्यावर आणली आहे.
गळ्यात कांद्याची माळ, डोळ्यात अश्रू:माढ्यात शेतकरी पुत्राने अनोख्या पद्धतीने दाखल केला उमेदवारी अर्ज
