![]()
नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीत वरिष्ठांकडून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) युवासेना शहर अध्यक्ष अक्षय गवळी यांनी १८ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्थानिक विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही अधिकृत घोषणा केली. नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल २५ दिवसांनी अंजनगावमध्ये उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, शिवसेना (उबाठा) कडे पुरेसे संख्याबळ असतानाही स्वपक्षाचा उमेदवार न निवडता उपाध्यक्षपदासाठी भाजपाला समर्थन देण्यात आले होते. या चर्चेनंतर आता स्वीकृत नगरसेवक निवडीतून नव्या वादाला तोंड फुटले आहे. गवळी यांच्या मते, स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांनी स्वतः (अक्षय गवळी), राजेंद्र टांक, राजेंद्र पाटील आणि पंकज मोदी यांनी अर्ज दाखल केले होते. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शब्द दिल्याने ते निश्चिंत होते. मात्र, ऐनवेळी नव्या नावाचा प्रस्ताव पुढे येत पंकज मोदी यांची निवड झाल्याचे गवळी यांचे म्हणणे आहे. या घडामोडीमुळे पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांची किंमत शून्य झाली असून, या संपूर्ण प्रक्रियेत कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या घडामोडींनंतर शिवसेना (उबाठा) मध्ये मोठी गळती लागणार का, असा प्रश्न आता उघडपणे उपस्थित झाला आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने आगामी काळात याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. अंजनगाव सुर्जीच्या स्थानिक राजकारणात नव्या वादळाचा स्पष्ट इशारा या घटनेतून मिळाला आहे. या आरोपांवर युवासेना, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख अंकुश कवाडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अक्षय गवळी यांना सलग चार वेळा युवा सेनेचे शहर अध्यक्षपद देऊन नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदाकरिता उमेदवारी सुद्धा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी श्रेष्ठींसोबत या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती. आर्थिक व्यवहाराबाबतचा त्यांचा आरोप निखालस खोटा असून, आमच्या पक्षात असा कुठलाच प्रकार होत नाही.
युवासेना शहरप्रमुखाचा पदाचा राजीनामा:अंजनगाव सुर्जी स्वीकृत सदस्य निवडीत आर्थिक व्यवहाराचा आरोप
