रेल्वे सुरक्षा बल, नांदेड विभागाची जून २०२६ मधील उल्लेखनीय कामगिरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहिमा प्रभावी


नांदेड (प्रतिनिधी)-  नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने जून २०२६ या महिन्यात रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण, हरविलेल्या व्यक्ती व मालमत्तेचा शोध, महिला प्रवाशांना सुरक्षा व सहाय्य तसेच रेल्वे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध विशेष मोहिमा प्रभावीपणे राबवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या मोहिमांमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून रेल्वे मालमत्तेचे संरक्षण, गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, हरविलेली मालमत्ता शोधून ती संबंधित प्रवाशांना परत देणे, अल्पवयीन मुलांचे संरक्षण, महिला प्रवाशांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे तसेच रेल्वे अधिनियमांतर्गत नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली.
जून २०२६ मधील प्रमुख कामगिरी:
* ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ३ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका करून त्यांना बाल कल्याण समिती (CWC) यांच्या स्वाधीन करण्यात आले.
* ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत हरविलेल्या मालमत्तेच्या १० घटनांमध्ये एकूण ₹२,०५,५००/- किमतीची मालमत्ता शोधून संबंधित प्रवाशांना परत करण्यात आली.
* ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ अंतर्गत प्रवाशांच्या सामान चोरी (ToPB) संदर्भातील १७ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. २२ संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ₹१,०९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना शासकीय रेल्वे पोलीस (GRP) यांच्या ताब्यात देण्यात आले.
* ऑपरेशन ‘मेरी सहेली’ अंतर्गत १,९९७ महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान सुरक्षा, मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य प्रदान करण्यात आले.
* ऑपरेशन ‘रेल सुरक्षा’ अंतर्गत रेल्वे मालमत्तेच्या चोरीसंदर्भात ४ गुन्हे नोंदवून ११ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ₹८,२७,०९९/- किमतीची रेल्वे मालमत्ता जप्त करण्यात आली.
* रेल्वे अधिनियम अंतर्गत विविध कलमांनुसार ३४१ प्रकरणांमध्ये २८४ जणांविरुद्ध कारवाई करून ₹३२,५३५/- दंड वसूल करण्यात आला. तसेच जन विश्वास अधिनियम अंतर्गत ११८ जणांविरुद्ध कारवाई करून ₹८४,०००/- दंड आकारण्यात आला.

प्रवाशांच्या सामान चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई
दि. ०६ जुलै २०२६ रोजी परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या CIB पथकाने व GRP, परभणी यांच्या संयुक्त कारवाईत गाडी क्रमांक १७६६२ (निजामाबाद–काचीगुडा एक्स्प्रेस) दरम्यान जनरल डब्यात चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सामान चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान संशयितांना त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP, परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १५२/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११० व ११७ अंतर्गत प्रकरण नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सायबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईल चोर जेरबंद
रेल्वे प्रवाशांचा चोरीस गेलेला मोबाईल शोधण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या CIB पथकाने व GRP यांच्या संयुक्त कारवाईत आणखी एक महत्त्वाचे यश मिळविले.
गुंटूर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १७२५३) मधून चोरीस गेलेल्या ₹१५,९९९/- किमतीच्या सॅमसंग मोबाईलचा सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माग काढण्यात आला. प्राप्त लोकेशनच्या आधारे आरोपी रोहित शंकर खानपटे (रा. आनंद नगर, परभणी) यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP च्या ताब्यात देण्यात आले असून त्याचा GRP, नांदेड येथील गुन्हा क्रमांक ५८८/२०२५ शी संबंध जोडण्यात आला आहे.

रेल्वे प्रवाशांना आवाहन
दीपचंद्र आर्य, वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, नांदेड यांनी सर्व रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान सतर्क व जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी आपल्या सामानावर व वैयक्तिक वस्तूंवर सतत लक्ष ठेवावे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच त्यांच्याकडून अन्नपदार्थ, पिण्याचे पाणी, शीतपेये किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत. विशेषतः गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रोकड, दागिने व इतर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी.

प्रवाशांनी केवळ वैध प्रवास तिकीट अथवा अधिकृत प्रवास परवानगीसह प्रवास करावा. प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती, बेवारस सामान किंवा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP) किंवा कर्तव्यावरील कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यास माहिती द्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा तात्काळ मदतीसाठी रेल मदत (Rail Madad) हेल्पलाईन क्रमांक १३९ वर संपर्क साधावा. प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण, असुरक्षितता किंवा गैरसोयीची भावना निर्माण झाल्यास त्यांनी कोणतीही शंका न बाळगता त्वरित रेल्वे सुरक्षा बलाशी संपर्क साधावा. “मेरी सहेली” उपक्रमांतर्गत रेल्वे सुरक्षा बलाचे समर्पित कर्मचारी महिला प्रवाशांना चोवीस तास सुरक्षा, मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देत आहेत, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होत आहे.

आपली सतर्कता हीच आपल्या सुरक्षित प्रवासाची सर्वात मोठी हमी आहे.
रेल्वे सुरक्षा बल, नांदेड विभाग रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण तसेच रेल्वे परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक व प्रभावी अंमलबजावणीच्या उपाययोजनांद्वारे सातत्याने कटिबद्ध असून भविष्यातही अशाच प्रभावी कारवाया सुरू ठेवणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *