![]()
मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्का
.
पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत असलेल्या मराठी माणसाच्या हिताचे आणि मराठी भाषेचे रक्षण करणे आणि वाढवणे ही आमची जबाबदारी आहे आणि आमचे वचन देखील आहे. तसेच मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेला, याला जबाबदार कोण? मुंबईत मराठी माणसाला परत आणण्याची देखील आमची जबाबदारी आहे.
मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. 20 हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून याची अंमलबजावणी पुढील एक वर्षात केली जाईल. झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होते. 40 लाख लोकांना घर देणे. परंतु, मागच्या अनेक वर्षात काहीच झाले नाही. वारसा सांगणाऱ्यांची ती जबाबदारी होती. परंतु आता आम्ही ते पूर्ण करणार आहोत. सुनियोजित मुंबईचा विकास करण्याचे आमची जबाबदारी असून ती आम्ही या वचननाम्यातून करणार आहोत. गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचे आम्ही काम सुरू केले आहे. आतापर्यंत 12 हजार लोकांना घरे दिली आहेत. देशाच्या पंतप्रधानानांनी देखील घोषणा केली आहे की सर्वांसाठी घरे यानुसार आम्ही काम करत आहोत. मुंबईतला माणूस हा बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेलेला पुन्हा यावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, अशी टीका विरोधक आमच्यावर करत असतात. पण पंतप्रधान मोदींनी मुंबईला फार महत्त्व दिले आहे. मुंबईला फीनटेक सीटी करण्याचा निर्धार आमचा आहे. बीकेसीला इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, स्टार्टअप हब उभारले जाणार आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष असून महापालिकेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न करण्याचा आमचा मानस आहे. बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत, लघु उद्योजकांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कोळीवाडा आणि गावठाण यांचे स्वतंत्र डीसीआर तयार करून पुनर्विकास, पुनर्विकास प्रकल्प राबवताना जी काही अडथळे येत होती, सगळे अडथळे आम्ही दूर केले आहेत. पाणीपट्टीत दरवर्षी 8 टक्के वाढ होते, पण ही वाढ पुढील 5 वर्षांसाठी स्थगित केली आहे. प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी 17 हजार कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणे, प्रदूषित पाणी समुद्रात सोडणे बंद केले जाणार. मुंबई खड्डेमुक्त करणार, असे आश्वासन शिंदेंनी दिले आहे.
मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबई सोडून जावे लागणार नाही- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीचा वचननामा आज प्रकाशित केला आणि उपमुख्यमंत्र्यांनी या वचननाम्याचे हायलाइट आपल्या समोर ठेवले आहे. आम्ही मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना केवळ हातच घातला नाही तर ते प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास आम्ही निर्माण केला आहे. आम्ही जो काही वचननामा देत आहोत, ते पूर्ण करणार आहोत. या वचननाम्यावर आधारित अॅक्शन टेकन रिपोर्ट आम्ही फॅक्ट शीट म्हणून लोकांसमोर मांडू. गृहनिर्मणाचा जो प्रश्न आहे मुंबईकरांचा, यातील विविध निर्णय आम्ही घेतले आहेत. एक संकल्प आम्ही आज घेतला आहे, मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे, याला काहीही झाले तरी मुंबई सोडून जावे लागणार नाही. त्याला मुंबईतच घर देणार आणि हे आम्ही करून दाखवत आहोत.
