![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे आश्वासन दिले. कात्रज चौकात आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी, जनतेने मतदानाच्या दिवशी आमची काळजी घेतल्यास पुढील पाच वर्षे आम्ही जनतेची काळजी घेऊ, असे म्हटले.
.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अनेक योजनांमुळे पुण्यात हा विकास आराखडा आणण्यात आला आहे. पुणे शहराची ओळख सांस्कृतिक, औद्योगिक आणि विद्येचे माहेरघर अशी असून, मागील पाच वर्षांत पुणे मनपात सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. विरोधकांनी आरसा पाहावा म्हणजे त्यांना वस्तुस्थिती समजेल, असेही ते म्हणाले.
या जाहीर सभेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, आमदार योगेश टिळेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या पुण्याची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांमुळे तापली आहे. मात्र, आपले संपूर्ण लक्ष शहराच्या विकासावर केंद्रित आहे. पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून, ते राज्याचे आर्थिक इंजिन आहे. आगामी जनगणनेत पुण्याची लोकसंख्या अंदाजे ६५ लाख होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
शहर वाढत असताना आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. पुणे मेट्रोबाबत अनेक चर्चा झाल्या, पण प्रत्यक्ष काम सुरू होत नव्हते. आम्ही पुण्यात ११० किमी मेट्रो मार्ग नियोजित केला असून, त्यापैकी ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर २४ किमी काम अंतिम टप्प्यात आहे.
सांडपाणी योजना सुरू करून प्रदूषित पाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया सुरू केली आहे. ८८ किमी नदी सुधार प्रकल्प सुरू केल्यामुळे पूर नियंत्रण होऊन नदीपात्राच्या सौंदर्यात भर पडणार आहे. २४/७ पाणी योजना सुरू केली असून, तिचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ४४ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
