![]()
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणालाही, कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण दिले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून लावलेल्या आरोपांना नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या घटनांची आठवण करून देत ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या काळात पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाले, नौदल अधिकाऱ्यावर हल्ले झाले. त्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला होता, याचे आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी आधी करावे. उबाठा गटाचे जे काही राजकीय नुकसान झाले आहे, त्याला सर्वाधिक कारणीभूत राऊत हेच आहेत. ..आधी जनतेसमोर प्रायश्चित्त घ्यावे नवनाथ बन म्हणाले की, प्रभू श्रीरामांच्या नावाने उद्धव ठाकरे राज्यभर फिरणार असतील तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, त्यांनी प्रभू श्रीरामांच्या नावाने राजकारण करण्याऐवजी, हिंदुत्वाचा आणि राममंदिर प्राणप्रतिष्ठेचा जो अपमान केला, त्याबद्दल आधी जनतेसमोर प्रायश्चित्त घ्यावे. केवळ काँग्रेसच्या दबावामुळे राममंदिराच्या ऐतिहासिक सोहळ्याला गैरहजर राहिल्याबद्दल ठाकरे गटाने आधी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. तसेच रामरक्षा म्हणण्यापूर्वी त्यांनी पुस्तक समोर ठेवून ती आधी व्यवस्थित वाचायला शिकावी. सीएमपद बोलीने ठरत नसते नवनाथ बन म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाला पेलली नाही, याचा वाईट अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने कोविड काळात घेतला आहे आणि त्याचाच निकाल जनतेने निवडणुकीत दिला आहे. मुख्यमंत्रीपद हे कोणाच्या बोलीने ठरत नसते, तर ते जनतेच्या आशीर्वादाने ठरते. स्वतः काँग्रेससोबत सत्ता स्थापनेसाठी हिंदुत्वाची तडजोड करणाऱ्या आणि विचारांची बोली लावणाऱ्यांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी 14 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे विरोधकांच्या अशा निरर्थक टीकेने त्यांचा काहीही बिघडणार नाही. हेही वाचा.. शिंदेंच्या माजी नगरसेवकाची महिला डॉक्टर अन् नर्सला मारहाण:कल्याणमधील संतापजनक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा..
केडीएमसी मारहाण प्रकरणी कठोर कारवाई करणार:उद्धव ठाकरेंच्या काळात पालघर साधू हत्याकांड विसरलात का?- भाजप
