![]()
शेती तोटा होत असतानाही हार न मानता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळ्याच्या शेतकऱ्याने चांगलीच शक्कल लढवली. आधी बाजारपेठेचा अभ्यास केला आणि नंतर वडिलोपार्जित ७ एकर शेतीवर एकच पीक घेण्याऐवजी सात वेगवेगळी पिके घेतली. याचा फायदा
.
केऱ्हाळ्यातील शेतकरी राजू अजबसिंग बारवाल यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून तोट्यातील शेतीतून फायदा मिळवला. विशेष म्हणजे ही सर्व पिके त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीवर घेतली असून पाणी, खत व खर्चाचे योग्य नियोजन केले आहे. राजू बारवाल यांनी त्यांच्या ७ एकर शेतीत गहू, मका, कपाशी, तूर, कांदा, सीड्स, डॉलर हरभरा, आले, कोथिंबीर यासह एक एकरात फळबाग विकसित केली आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत त्यांनी पीकनिहाय नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुरू केला आहे. पिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास राजू यांनी अजित-१०८ या सुधारित गव्हाच्या वाणाची निवड केली आहे. गेल्या चार वर्षांपासून टोकन यंत्राद्वारे गव्हाची पेरणी करून उत्पादन खर्चात बचत करत आहेत. त्यांनी केवळ २० गुंठ्यात ७ किलो बियाणे पेरून तब्बल १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतले आहे.
बारवाल यांच्या यशाची “पंचसूत्री’
राजू बारवाल यांच्या शेतीसाठी पंचसूत्री यशस्वी ठरली. यात त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता ७ प्रकारची पिके घेतली. दुसरे म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब मोजून वापरल्याने पिकांची जोमदार वाढ झाली. टोकन यंत्रामुळे पेरणीसाठी आधुनिक यंत्राचा वापर केल्याने बियाणे आणि मजुरी खर्चात बचत झाली. योग्य खत व्यवस्थापन झाल्याने विद्राव्य खतांचा वापर थेट मुळाशी केल्याने उत्पादनात वाढ झाली. सर्वात शेवटी म्हणजे कोणत्या पिकाला कधी चांगला भाव मिळेल, याचे आगाऊ नियोजन केल्याने त्यांना यश मिळाले.
विविध पिकांचे खर्च उत्पन्नाचे गणित
राजू यांनी शेतात कांदा लावला. यात त्यांना ३० हजार बियाणांवर व मजुरीसाठी २० हजार खर्च झाला. तर उत्पन्न २ लाख झाले. खर्च वजा जाता दीड लाखांचा निव्वळ नफा झाला. २० गुंठे अद्रकमधूनही त्यांना १ लाखांचा निव्वळ नफा झाला. असेच गहू, कोथिंबिर, हरभरा, मकापासूनही उत्पन्न मिळत आहे. सरासरी ३ ते ४ लाखांपर्यंत राजू यांना नफा मिळत आहे.
या प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती….9923738657
