![]()
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या राजकीय धामधुमीत शहरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असतानाच, लष्कर परिसरात एका इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अ
.
मिळालेल्या माहितीनुसार, अयुब सय्यद यांची हत्या त्यांच्या राहत्या घरात करण्यात आली. आज दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. सोलापूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात ही हत्या रात्रीच्या सुमारास धारधार शस्त्राने किंवा गळा आवळून केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
संशयित सीसीटीव्हीत कैद
पोलिस तपासात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्री 11:30 वाजता तीन अनोळखी व्यक्ती अयुब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर पहाटे 2:00 वाजता याच तीन व्यक्ती संशयास्पदरीत्या घरातून बाहेर पडून पसार झाल्याचे फुटेजमध्ये कैद झाले आहे. या अज्ञात तिघांनीच अयुब यांची हत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
राजकीय वैमनस्य की सोन्याची लूट?
अयुब सय्यद हे केवळ राजकारणातच नव्हे, तर सोशल मीडियावरही अत्यंत सक्रिय होते. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फॉलोअर्स होते. त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते आणि त्यासंदर्भातील फोटो व व्हिडिओही इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. विशेष म्हणजे, अयुब यांच्या अंगावर नेहमी लाखो रुपयांचे सोने असायचे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही हत्या केवळ राजकीय वादातून झाली की सोन्याच्या लुटीच्या उद्देशाने? या दोन्ही कोनांतून पोलिस तपास करत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव
१५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असताना एका उमेदवाराची अशा प्रकारे हत्या होणे, ही पोलिस प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. लष्कर परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयुब यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, संशयित आरोपींच्या अटकेनंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा…
मंगेश काळोखे हत्या प्रकरण:एकनाथ शिंदेंनी घेतली कुटुंबीयांची भेट, सुनील तटकरे रायगडचा आका म्हणत महेंद्र थोरवेंचे गंभीर आरोप
रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता टोकाचा आणि हिंसक वळणावर पोहोचला आहे खोपोली येथील शिवसेनेच्या महिला नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरचौकात निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. सविस्तर वाचा…
