![]()
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांच्या कामाच्या पद्धतीची आणि पारदर्शक कारभाराची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या या कडक शिस्तीचा आणि धडक कारवाईचा सकारात्मक परिणाम आता यंदाच्या आषाढी वारी यात्रा उत्सवातही पाहायला मिळणार असून, तसे संकेत खुद्द पालकमंत्र्यांनी दिले आहेत. आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे जिल्हा प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर आणि पालखी मार्गावर येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आपण खुद्द आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करून त्यांना विशेष लक्ष देण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कालच बुलढाण्यातील शेगाव येथे अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून मंदिर परिसरातील पेढ्यांचे नमुने जप्त केले असून, अशीच कडक नजर आषाढी वारीतही ठेवली जाणार आहे. 5 हजार एसटी बसेसची सुविधा वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. आषाढी यात्रा काळात वारकऱ्यांच्या सोयीसाठी परिवहन विभागाने तब्बल 5 हजार एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदाच्या वारीत भाविकांना अधिकाधिक दर्जेदार व उत्तम प्रवास सुविधा पुरवण्याची ग्वाही परिवहन विभागाने दिल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. पालखी मार्गावर 10 हजार नवीन झाडे लावली जाणार याशिवाय, पर्यावरण आणि वारकऱ्यांच्या निवाऱ्याचाही विशेष विचार प्रशासनाकडून करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे नव्याने काम झाल्यामुळे, या रस्त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत मार्गावरील सावली देणारी अनेक जुनी झाडे तोडावी लागली होती. ही तूट भरून काढण्यासाठी आणि वारकऱ्यांना नैसर्गिक सावली मिळावी यासाठी, यंदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालखी मार्गावर तब्बल 10 हजार नवीन झाडे लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोरे यांनी दिली. भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूरचा दौरा करून पालखी मार्गासह चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि 65 एकर परिसराची सविस्तर पाहणी केली. यंदा राज्यात ‘अल निनो’च्या संकटामुळे पाणीटंचाई असून पाण्यावर काही निर्बंध असले तरी, आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी चंद्रभागा (भीमा) नदीत पाणी सोडण्याबाबत आपण थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती गोरे यांनी यावेळी दिली. तसेच, राज्यात सध्या पाण्याची टंचाई जाणवत असली तरी, पालखी मार्गावर मात्र वारकऱ्यांसाठी पाण्याची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून पूर्वतयारीचा आढावा
