![]()
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्याच्या लोहगड हत्या प्रकरणाने पुरुषांवरील अत्याचाराची एक अतिशय गंभीर बाजू समाजासमोर आणली आहे. स्वतःच्याच होणाऱ्या नवऱ्याला (केतन अग्रवाल) आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून निर्दयीपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार यात उघडकीस आला आहे. या भीषण गुन्ह्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची पुणे पोलिसांकडून अत्यंत कसून चौकशी सुरू असून, दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आता आपला मोर्चा सियाच्या कुटुंबाकडे वळवला असून, सियाच्या भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे, आपला मुलगा गमावलेल्या केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी न्यायाच्या आशेने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना साकडे घातले आहे. न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर सोडणार नाही- मुख्यमंत्री लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्या प्रकरणी, त्यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अग्रवाल कुटुंबीयांचे सांत्वन करत, त्यांना न्याय देण्यासाठी सरकारकडून कोणतीही कसूर सोडली जाणार नाही आणि या प्रकरणातील दोषींना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, असे भक्कम आश्वासन दिले. अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रकरणात एंट्री अग्रवाल कुटुंबीयांनी या खटल्यासाठी जलदगती न्यायालयाची स्थापना आणि विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची केलेली मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना तातडीने आवश्यक ते निर्देश दिले असून, स्वतः अॅड. उज्ज्वल निकम यांनीही या न्यायदानाच्या प्रक्रियेत विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास आपली संमती दर्शवली आहे. लग्नाला नकार देणं सोपं होतं, हत्या करायची गरज नव्हती- विशाल अग्रवाल (केतनचे वडील) दरम्यान, मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सियाचा भाऊ साहिल आणि तिचा प्रियकर हे जवळचे मित्र होते, त्यामुळे केतनच्या हत्येचा प्लॅन हा आणखी काही जणांना माहीत असण्याचा संशय आहे. तसेच केतन डोक्याला विग वापरायचा ही माहिती लग्नाच्या आधी सियाल आणि तिच्या कुटुंबाला देण्यात आली होती. परंतु, हत्या करण्याचे हे काही कारण असू शकत नाही. लग्नासाठी नकार देणं हे सियासाठी खूप सोपे होते, त्यासाठी तिने केतनची हत्या करण्याची गरज नव्हती, असे विशाल अग्रवाल यांनी म्हटले आहे.
लोहगड हत्या प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; अॅड. उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया केतनच्या अडचणीत वाढ
