एकनाथ शिंदे आमचे नेते, त्यांचाच शब्द अंतिम:लढाई केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित, महायुतीला तडा जाणार नाही- अब्दुल सत्तार
![]()
छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत नाट्य रंगात आले आहे. ही जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली असून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर भाजपवर दुजाभावाचा आरोप करत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समीर सत्तार यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती आहे. स्थानिक मनपा, जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कमकुवत केल्याची तक्रार घेऊन सत्तारांसह जिल्ह्यातील 6 आमदार आणि 1 खासदाराने शिंदेंशी साडेतीन तास चर्चा केली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले की, ही लढाई केवळ आमच्या जिल्ह्यापुरती आहे. राज्यात तसे काही नाही. स्थानिक पातळीवर काही मतभेद असले तरी राज्यात आणि देशात आम्ही भाजपसोबत खंबीरपणे उभे आहोत. राज्यात भाजप हा मोठा भाऊ तर राष्ट्रवादी काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत असून, आमच्यामुळे महायुतीला कोणताही तडा जाणार नाही. या वादावर पुढील तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. अंबादास दानवेंच्या भेटीवर बोलताना त्यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगत, आपले नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आपल्याला अंतिम आणि मान्य असेल, अशी मवाळ भूमिका घेतली आहे. आमच्यामुळे युतीला तडा जाणार नाही अब्दुल सत्तार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत ते जे सांगतील ते जे बोलतील तो निर्णय अंतिम राहील. आमच्यामुळे राज्यातील युतीला कुठेही तडा जाणार नाही याची आम्ही दक्षता घेणार नाही. छत्रपती संभाजीनगरचे 6 आमदार आणि 1 खासदार यांची जवळपास साडेतीन तास शिंदेंसोबत बैठक झाली. दोन दिवसात काय ते स्पष्ट होईल. राज्यात भाजपच मोठा भाऊ अंबादास दानवे यांच्या भेटीवर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, आम्ही मुस्लिम असल्याने सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो. मात्र जो काही निर्णय असेल तो एकनाथ शिंदेच घेणार. आम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित कार्यकर्ते आहोत. हा विषय राज्याचा नाही. राज्यात भाजपच मोठा भाऊ आहे. आम्ही छोटे आहोत.
