सूर्यकांतसोबत काम करणे भाग्ययोग, आशा काळे यांचे मत:जन्मशताब्दी कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्रींनी व्यक्त केल्या भावना

0
895b8027-cad5-4993-8759-29a134edc90b_1780464410243.jpg




ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी नुकतेच सांगितले की, किशोरवयात सूर्यकांत मांडरे यांना प्रथम पाहिल्यावर त्या भारल्यासारख्या झाल्या होत्या. त्यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर नायिका म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी भाग्ययोग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सूर्यकांत हे केवळ एक श्रेष्ठ अभिनेतेच नव्हते, तर माणुसकीच्या नात्यानेही ते महान होते, असेही काळे म्हणाल्या. पूना गेस्ट हाऊस आणि प्रकाश सूर्यकांत मांडरे व परिवार यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात ‘सूर्यकांत मांडरे : एक कलासक्त तेजस्वी कलाकार’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यकांत मांडरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी कवयित्री प्रतिभा शाहू मोडक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, प्रकाश सूर्यकांत मांडरे आणि पूना गेस्ट हाऊसचे डॉ. किशोर सरपोतदार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आशा काळे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्यांनी सूर्यकांत यांना प्रथम उषा किरण यांच्यासोबत चित्रीकरण करताना पाहिले होते. त्यावेळी त्या त्यांच्याकडे भारल्यासारख्या बघत होत्या. कालांतराने भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटात त्या सूर्यकांत यांच्या नायिका झाल्या. त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका केल्या. ‘गनिमी कावा’ चित्रपटातील एका प्रेमगीताच्या चित्रीकरणासाठी त्यांना गजरा हवा होता, तो सूर्यकांत यांनी पूर्ण केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात ते उभे राहिले की साक्षात महाराजांची ऊर्जा पोहोचल्यासारखे वाटत असे, असेही त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी यांनी ‘प्रीतीसंगम’ या चित्रपटाच्या वेळी सूर्यकांत यांच्याशी पहिली भेट झाल्याचे सांगितले. ते प्रसंग खूप छान समजावून सांगत असत. प्रत्येकाला सांभाळून घेण्याची वृत्ती आणि खेळीमेळीचे वातावरण हे त्यांचे वेगळेपण होते, असे गांधी म्हणाल्या. कवयित्री प्रतिभा शाहू मोडक यांनी सांगितले की, 1993 मध्ये त्या पुण्यात आल्या तेव्हा सूर्यकांत आणि चारुकाका सरपोतदार ही दोनच माणसे त्यांच्या परिचयाची होती. त्या नेहमी भेटत असत आणि शाहू मोडकांनंतर सूर्यकांत त्यांना सातत्याने दिलासा देत असत. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सूर्यकांत आणि त्यांची भेट चित्रपट महामंडळाच्या निमित्ताने झाली आणि ते स्नेही बनले, अशी आठवण सांगितली. सूर्यकांत उत्तम चित्रकारही होते. भालजी पेंढारकर हे सर्वांचे गुरू होते आणि चारुकाका सरपोतदार हा त्यांना जोडणारा दुवा होता, असेही फुटाणे म्हणाले. ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी सूर्यकांत यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख केला. कोल्हापूर तेव्हा कलाकारांचे आगार होते. पुण्यात असताना सूर्यकांत स्कूटरवरून त्यांच्या घरी येत असत आणि मनमोकळ्या गप्पा रंगत असत, असे पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *