अब्दुल सत्तारांची व्यथा खरी:संजय गायकवाडांनी महायुतीला दिला घरचा आहेर, म्हणाले- माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप
![]()
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत. छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषदेची जागा ही भाजपला सुटल्याने शिवसेना शिंदे गटातून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलाचा म्हणजे समीर सत्तारचा उमेदवारीचा अर्ज बंडखोरी करत दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर सत्तार यांनी भाजप शिवसेनेला संपवत असल्याचा आरोपही केला होता. अब्दुल सत्तार यांच्या या भूमिकेनंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. यात शिंदे यांनी सत्तार यांना महायुतीचा धर्म पाळण्याच्या सूचना दिल्याचे समजते. असे असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अब्दुल सत्तार यांची बाजू घेत महायुतीला घरचा आहेर दिला आहे. अब्दुल सत्तार यांच्या व्यथा खरी आहे. एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप होत असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे. संजय गायकवाड म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 50 आमदार बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्तेमध्ये सोबत आले. अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे. सातारा प्रकरणाचा संदर्भ देत गायकवाड म्हणाले, दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही, हे महाराष्ट्राने बघितले आहे. पुढे बोलताना संजय गायकवाड म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताई पवार यांना अजूनही अर्थ खाते मित्र पक्षाकडून मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत देखील आमच्यासारखा खेळ होतो आहे का? असे दिसून येत आहे. माझ्या मतदारसंघात देखील मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असून, अशा प्रकारे मित्र पक्ष असताना एकमेकांचे खच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही, असे गायकवाड यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे. शिवसेना आमदार खासदारांची ठाण्यात बैठक छत्रपती संभाजीनगरमधील आमदार आणि खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात मध्यरात्री उशिरापर्यंत एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही खलबते प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात झाल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिली असून, आमदार अब्दुल सत्तार यांच्या नाराजीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत आणखी एक स्वतंत्र बैठक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार काय म्हणाले? एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश मला मान्य आहे. पुढे अंबादास दानवे यांच्या भेटीवर बोलताना सत्तार म्हणाले, आम्ही मुस्लिम असल्याने सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो. मात्र जो काही निर्णय असेल तो एकनाथ शिंदेच घेणार. आम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित कार्यकर्ते आहोत. हा विषय राज्याचा नाही. राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. आम्ही छोटे आहोत. राष्ट्रवादी आमच्यापेक्षा छोटी आहे. आम्ही सर्वजण महायुती म्हणून राज्यात लढणार आणि राज्यातील 17 जागा या महायुतीच्या निवडून येतील, असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला. दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात सध्या उधाण आले आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा थेट आरोप केल्याने या चर्चांना अधिक वेग आला आहे. त्यातच एका प्रवासादरम्यान ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांची झालेली अनपेक्षित गळाभेट समोर आल्याने, या दोन्ही गटांच्या संभाव्य मनोमीलनाच्या राजकीय चर्चांना आता आणखीच बळ मिळाले आहे.
