रोजंदारी करून पाहिलेले खाकीवर्दीचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पूर्ण:कन्नड तालुक्यातील हतनूर येथील गुंजाळ बंधूंची एकाचवेळी निवड
![]()
प्रतिनिधी | हतनूर जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले कोणतीही परिस्थिती बदलू शकतात, याचे जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण कन्नड तालुक्यातील हतनूर येथे पाहायला मिळाले. अत्यंत गरिबीत, आई-वडिलांसोबत मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या विष्णू भानुदास गुंजाळ आणि राहुल भानुदास गुंजाळ या दोन सख्ख्या भावांनी पहिल्याच प्रयत्नात भारतीय सैन्य दलाच्या अग्नीवीर भरतीत यश मिळवून स्वप्न पूर्ण केले आहे. या दोघांच्या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विष्णू आणि राहुल यांनी शारीरिक आणि लेखी परीक्षेची कसून तयारी केली होती. मैदानी आणि लेखी चाचणी देऊन घरी परतल्यानंतर, गरिबीमुळे ते स्वस्थ बसले नाहीत. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते नेहमीप्रमाणे पुन्हा रोजंदारीच्या कामावर जाऊ लागले. दोघांची अग्नीवीर म्हणून निवड झाल्याची बातमी आली. एकाच वेळी दोन्ही मुलांची सैन्यदलात निवड झाल्याचे समजताच आई लक्ष्मीबाई आणि वडील भानुदास गुंजाळ यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ग्रामस्थांनी गुंजाळ यांच्या घरी जाऊन दोन्ही भावांचे अभिनंदन केले. विष्णू आणि राहुल गुंजाळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
