तीव्र उष्णतेचा फटका : माळेगाव टोलनाक्याजवळ धावती कार जळून खाक
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल शेटकार हे आपल्या नातेवाईकांसोबत लग्न समारंभासाठी लोहा येथे आले होते. समारंभ आटोपल्यानंतर ते दुपारच्या सुमारास अहमदपूरकडे परत निघाले होते. माळेगाव टोलनाक्याजवळ दुपारी साधारण २.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या कारच्या बंपरमधून अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. मात्र, प्रचंड उकाड्यामुळे काही क्षणातच गाडीने पेट घेतला. आग विझवण्यासाठी शेटकार यांनी आसपास पाण्याचा शोध घेतला, पण पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समोरच संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.टोल नाक्याजवळ पाणी सुद्धा उपलब्ध नव्हते. जेणे करून गाडीतून धूर निघत असतांना त्यावर टाकता आले असते. गाडीत असलेल्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, तीव्र उष्णतेमुळे कारचे इंजिन अतिउष्ण (ओव्हरहिट) झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान वाहनाची तपासणी, इंजिन कूलिंग सिस्टीमची योग्य देखभाल आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
