मी कुठेही असलो तरीही माझी नाळ अमरावतीशी जोडलेली असते !:न्यायालय इमारत कोनशिला समारंभप्रसंगी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या भावना
![]()
प्रतिनिधी । चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवारी ३ मे रोजी झाला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी बोलताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जिल्ह्यासोबत असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘मी नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजी नगर किंवा दिल्ली, कुठेही असलो तरी माझी नाळ नेहमी अमरावतीशी जोडलेली असते,. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या (दादासाहेब गवई) निवडणूक काळातील आठवणी सांगताना चांदूर रेल्वेतील अनेक नागरिकांशी असलेल्या जवळच्या संबंधांचा आवर्जुन उल्लेख केला. न्यायदान प्रक्रियेत पायाभूत सुविधांच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयात असताना त्यांना ‘इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी’चे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात राज्य सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्रात अनेक न्यायालयीन इमारतींची कामे मार्गी लागली, ज्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचा आणि विशेषतः अमरावतीचा नागरिक म्हणून न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणात योगदान देता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला न्यायमुर्ती अनिल किलोर, न्यायमुर्ती मुकुलिका जवळकर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील व निमंत्रक म्हणून स्थानिक न्यायालयाचे न्यायाधीश सुजित राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वास्तुविशारद यांनी तयार केलेल्या इमारतीच्या नकाशाचेही त्यांनी कौतुक केले. हा सोहळा चांदूर रेल्वेच्या न्यायिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या वेळी नगराध्यक्ष प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांच्या हस्ते माजी सरन्यायाधीश गवई यांचा जाहीर सत्कार केला. या वेळी शहरातील मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या वेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
