चिमुरडीच्या शोधात सामील तोच निघाला आरोपी:20 वर्षांपूर्वीच गावबंदी, तरीही विकृतपणा कायम; गावातून हाकललेला विकृत समोर
![]()
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील 65 वर्षीय आरोपीबाबत समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक ठरत आहे. विकृत वर्तनामुळे त्याला 20 वर्षांपूर्वीच मूळ गावातून हाकलण्यात आले होते, असे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा भोर तालुक्यातील साळवडे गावचा रहिवासी होता. त्या गावात महिलांशी गैरवर्तन आणि छेडछाड केल्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्यावर याआधीही महिलांशी संबंधित दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्याला गावबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो नसरापूर येथे येऊन राहत होता आणि छोट्या-मोठ्या कामांवर गुजराण करत होता. दरम्यान, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही घटना घडली. चिमुकली मुलगी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आजीने शोध सुरू केला. हळूहळू गावकरीही मदतीला धावले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या शोध मोहिमेत आरोपी स्वतःही सहभागी झाला होता. तो गावकऱ्यांसोबत मुलीचा शोध घेत असल्याचे समोर आले आहे. शोधादरम्यान काही ग्रामस्थांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे काहींना संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संताप अधिकच वाढला आहे. घटनेच्या उलगड्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची महत्त्वाची भूमिका ठरली. घटनेच्या वेळी गावात वीजपुरवठा खंडित झाल्याने बहुतांश कॅमेरे बंद होते. मात्र, मंदिरासमोरील एका घरातील सीसीटीव्ही बॅटरीवर सुरू होता. त्या कॅमेऱ्यात आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसला. यामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि प्रकरण उघडकीस आले. आरोपीच्या भूतकाळातील माहिती समोर या घटनेनंतर आरोपीच्या भूतकाळातील माहिती समोर येत असून, त्याच्या विकृत प्रवृत्तीची गंभीरता अधोरेखित झाली आहे. गावातून हाकलून दिल्यानंतरही त्याने आपले वर्तन बदलले नाही, हे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
