थिलोरी येथे गोठ्याला आग:नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
![]()
दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास विकी बावनेर यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. ही माहिती मिळताच गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी तात्काळ धाव घेतली. सुदैवाने, या आगीत गोधनाचे कोणतेही नुकसान झाले नाही. तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वेळेवर मदतीमुळे आग विझवण्यात यश आले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. सध्या विदर्भामध्ये उन्हाचा पारा झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे दुपारच्या सुमारास जंगलात किंवा गावांमध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाने अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाची चमू तयार ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
