अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी:'आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान', सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
![]()
विधानपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा सध्या केली जात आहे. यात भाजपने प्रज्ञा सातव यांच्यासह 6 नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून केली जात होती. मात्र शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले. यात सुषमा अंधारे यांचे देखील नाव आघाडीवर होते, मात्र, त्यांना संधी देण्यात आली नाही. यावर अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत, उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले नातेच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे त्यांनी पोस्टमधून सूचित केले आहे. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपने 6 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीसह सत्ताधारी शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांना पुन्हा एकदा संधी देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या जागेसाठी सुषमा अंधारे यांचे नाव शर्यतीत होते आणि त्यांच्या ‘मातोश्री’वरील नुकत्याच झालेल्या भेटीमुळे त्यांच्या उमेदवारीची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र अखेर ठाकरेंनी दानवेंच्या अनुभवावर विश्वास दाखवला. या राजकीय घडामोडीनंतर सुषमा अंधारे यांनीही मोठ्या मनाने या निर्णयाचे स्वागत करत एका ओळीत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली असून, या निर्णयावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी कमालीचे नाराज असल्याचे समजते. या नाराजीतूनच आता काँग्रेस विधान परिषदेसाठी आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असून, त्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून, पक्षश्रेष्ठींशी सविस्तर चर्चा केल्यानंतर लवकरच उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
