बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्याने मृत्यू, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये दावा; परिसरात कलिंगडाची विक्री बंद
![]()
मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या मृत्यूंविषयी राज्यात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना आता या मृतांचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. त्यात हे चारही मृत्यू किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आएशा दोकाडिया व जैनब दोकाडिया यांचा बिर्याणी व त्यानंतर कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाला होता. या कुटुंबातील 9 सदस्यांनी 25 एप्रिल रोजी रात्री 10.30 च्या सुमारास आपल्या नातलगांसोबत एकत्र बसून भोजन केले होते. त्यांनी त्यांचे नातलग आपापल्या घरी परतले होते. त्यानंतर उपरोक्त चौघांनी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास घरी असणारे कलिंगड घाल्ले होते. त्यानंतर रविवारी पहाटे 5 च्या सुमारास या चौघांचीही प्रकृती बिघडली होती. त्यांना भयंकर प्रमाणात उलट्या झाल्या होत्या. त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली. शेजाऱ्यांनी त्यांना तत्काळ लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार, अन्नातील विषबाधेमुळे या चौघांच्याही किडन्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. आता या चौघांनाही ही अन्न विषबाधा नेमक्या कारणामुळे झाली याचा तपास पोलिस करत आहेत. त्यासाठी चारही मृतांच्या मृतदेहाचा व्हिसेरा पुढील तपासणीसाटी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्यांचा हिस्टोपॉथोलॉजिकल रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले होते. अब्दुल्लाच्या आईने काय सांगितले? मृत अब्दुल्ला यांच्या आईने या घटनेविषयी सांगितले की, माझ्या मुलाचे अख्खे कुटुंबच संपले. माझा अजून त्यावर विश्वास बसत नाही. गत आठवड्यातच आम्ही भेटलो होतो. मी नातींसोबत चांगला वेल घालवला होता. माझी मोठी नात दहावीत, तर छोटी आठवीत होती. मला याहून अधिक सांगता येणार नाही. आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी केली कलिंगड विक्रेत्याची चौकशी अब्दुल्ला यांचा चुलत भाऊ मोहम्मद मुस्तफा इक्बाल यांनी सांगितले की, सर्व पाहुण्यांनी चिकन बिर्याणी खाल्ली होती. परंतु याच कुटुंबाने कलिंगड खाल्ला होता. त्यामुळे कलिंगडमधूनच विषबाधा झाल्याचा आम्हाला संशय आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्वच अंगानी तपास करत आहेत. त्यांनी कलिंगड विक्रेत्याचीही चौकशी केली. त्यात त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. सदर विक्रेत्याकडून अनेकांनी कलिंगड विकत घेतले. पण अद्याप इतर कुणीही आपल्यासोबत असा काही प्रकार झाल्याची तक्रार केली नाही. या घटनेनंतर फळ विक्रेत्यांनी कलिंगडाची विक्री बंद केली आहे. शेजारी राहणाऱ्या डॉक्टरांनी वाचवण्याचे केले होते प्रयत्न अब्दुल्ला दोकाडिया यांच्या इमारतीत वरच्या मजल्यावर डॉक्टर कुरेशी राहत होते. त्यांनी दाकोडिया कुटुंबातील चारही जणांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी सांगितले की, पहाटे 5 च्या सुमारास या कुटुंबाला उलटी व जुलाब सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी मला खाली बोलावले. मी तिथे पोहोचलो तेव्हा सर्वजण बेशुद्ध पडले होते. लहान मुलीची नसही सुरू नव्हती. मी सर्वांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लहान मुलीला साबु सिद्दीकी रुग्णालयात नेले. तिच्या आई-वडिलांना जेजे रुग्णालयात हलवले. तिथे नवऱ्याचा रक्तदाब कमी झाला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. त्यानंतर पती, पत्नी व मुली या तिघांचाही मृत्यू झाला. मी सर्वांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्यांच्या शरीरात काहीतरी असा विषारी घटक गेला होता की, त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडत गेली. त्यांच्या रक्तात अॅसिड तयार झाले होते. प्राथमिक तपासात त्यांनी मध्यरात्री कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. पण हा सर्व प्रकार नेमका कशामुळे झाला हे पोलिसच सांगू शकतील. तूर्त आम्हाला कलिंगडावरच संशय आहे, असे डॉक्टर कुरेशी यांनी सांगितले.
