ठाकरेंना पराभूत करण्यासाठी राऊतांचा गटच सक्रिय!:ठाकरेंची विधान परिषदेतील उपस्थिती 50 टक्केही नाही, त्यांना जागा अडवू नये- नवनाथ बन
![]()
उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषद निवडून लढवली तर संजय राऊत यांचा गट त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाकरेंनी निवडणूक लढवू नये म्हणून संजय राऊत गट सक्रिय आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे 6 वर्षे विधान परिषद होती त्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा एकही मुद्दा विधान परिषदेत मांडला नाही. त्यांची जर विधान परिषदेतील उपस्थिती बघितली तर ती 50 टक्के सुद्धा नाही. हे पद जनतेचा आवाज उठवण्यासाठी असते ती अडवण्याचे काम उद्धव ठाकरे करणार आहेत का? असा सवाल बन यांनी केला आहे. ..झुंडशाही मान्य नाही नवनाथ बन म्हणाले की, मराठीच्या नावाने गुंडगिरी करणे सहन करणार नाही. राज्य सरकारची भूमिका आहे की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे. भाषा हे संवादाचे माध्यम असले पाहिजे विसंवादाचे माध्यम होऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. राज्यात जाऊ तिथली भाषा आलीच पाहिजे. पण त्यासाठी झुंडशाही मान्य नाही. परप्रांतीय लोक मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मराठीची लिपी माहिती नाही, मग संपादक कशाचे? नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी मराठी भाषेची लिपी रोमन असल्याचा दावा करून त्यांनी आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलं आहे. महाराष्ट्रातील सामान्य नागरिकालाही मराठीची लिपी देवनागरी असल्याचं माहिती आहे, मात्र अनेक वर्षे ‘सामना’चे संपादक राहूनही राऊत यांना ही प्राथमिक गोष्ट माहिती नसणं आश्चर्यकारक आहे. स्वतःला मराठीचा पुरस्कर्ता म्हणून मिरवणारे राऊत प्रत्यक्षात मराठी भाषेचं नुकसान करत आहेत. पत्रकार परिषदेत वापरलेली त्यांची भाषा आणि केलेले दावे हे मराठीच्या स्तराला धक्का देणारे आहेत.मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान नसलेला व्यक्ती मराठी दैनिकाचा संपादक म्हणून काम करू शकतो का? असा सवाल बन यांनी केला आहे. तुमच्या घराला कोणाचेही नाव द्या.. KEM रुग्णालयाच्या नामांतरावर सवाल करत नवनाथ बन म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील महान व्यक्तिमत्त्व असलेल्या एकलव्याच्या नावाला विरोध का केला जात आहे? जर भारतीय परंपरेतील नायकांचं नाव देण्यास विरोध असेल, तर मग औरंगजेब किंवा अफजलखान यासारख्या आक्रमकांच्या वारशाला मान्यता द्यायची का? रुग्णालयाला बाबर, औरंगजेब यांचे नाव दिले तर तर त्याचे राऊतांनी समर्थन केले असते, असा टोला बन यांनी लगावला आहे. तुम्ही तुमच्या घराला कोणाचे नाव द्यायचे ते नाव द्या.
