जगातील कठीण शिखरावर महाराष्ट्राचा तिरंगा:एपीआय शिवाजी ननवरे यांनी धौलगिरी सर करून रचला इतिहास
![]()
धाडस, जिद्द आणि अपार चिकाटीच्या बळावर मानवी क्षमतेची नवी उंची गाठणारी एक प्रेरणादायी कामगिरी नागपूर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी करून दाखवली आहे. जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण समजले जाणारे धौलगिरी (८,१६७ मीटर) हे शिखर त्यांनी यशस्वीरीत्या सर करून महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा पराक्रम केला आहे. ही कामगिरी विशेष ठरते कारण महाराष्ट्र पोलीस दलातून धौलगिरी सर करणारे ते पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. उंच शिखरांवर सलग विजय ननवरे यांची गिर्यारोहणातील कामगिरी केवळ धौलगिरीपुरती मर्यादित नाही. त्यांनी यापूर्वीही जगातील अत्यंत कठीण आणि उंच शिखरांवर यशस्वी मोहीमा पूर्ण केल्या आहेत : माउंट एव्हरेस्ट (८,८४८.८६ मीटर)-जगातील सर्वोच्च शिखर, माउंट लोहत्से (८,५१६ मीटर)-चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर, माउंट मकालू (८,४८५ मीटर)-पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर, माउंट मनास्लू (८,१६३ मीटर)-आठव्या क्रमांकाचे उंच शिखर सर केले आहे. या सलग यशामुळे त्यांचे नाव भारतातील अग्रगण्य गिर्यारोहकांमध्ये आदराने घेतले जाते. त्यांच्या प्रत्येक मोहिमेतून जिद्द, संयम आणि परिश्रम यांचा उत्तम संगम दिसून येतो. धौलगिरी-धैर्याची अंतिम परीक्षा धौलगिरी हे शिखर गिर्यारोहकांसाठी खऱ्या अर्थाने कसोटी मानले जाते. अत्यंत कमी ऑक्सिजन, उणे तापमान, बर्फाचे वादळ, जीवघेणे हिमफट (क्रेव्हासेस) आणि खडतर चढाई-उतार यामुळे ही मोहीम अत्यंत धोकादायक ठरते. मात्र या सर्व आव्हानांवर मात करत ननवरे यांनी धैर्य, नियोजन आणि मानसिक ताकदीच्या जोरावर हे शिखर सर केले. कर्तव्य आणि साहस यांचा प्रेरणादायी संगम पोलीस सेवेत अत्यंत जबाबदारीची भूमिका बजावत असताना गिर्यारोहणासारख्या कठीण क्षेत्रात एवढी मोठी कामगिरी करणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे पोलीस दलातील अधिकारी व जवानांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, तरुण पिढीलाही मोठी प्रेरणा मिळत आहे. शिवाजी ननवरे यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. “अशक्य काहीच नाही, फक्त जिद्द आणि धैर्य हवे,” असे त्यांनी सांगितले.
