संजय गायकवाड यांना काय आक्षेपार्ह वाटले ते विचारणार:मी सुद्धा पुस्तक वाचेल, शिवीगाळ प्रकरणी मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
![]()
बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उसणजे गायकवाड यांनी त्या पुस्तकाबाबत नेमकी कशाबाबत भूमिका मांडली, याबाबत त्यांच्याशी बोलावे लागेल. संजय गायकवाड यांनी ते पुस्तक वाचले की नाही माहीत नाही. मी माहिती घेऊन त्यांना काय आक्षेपार्ह वाटले ते विचारेल. मी सुद्धा ते पुस्तक वाचतो, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना उदय सामंत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या रिक्षा-टॅक्सीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी माणसाला दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही. मराठीबाबत त्यांनी जबरदस्ती केलेली नाही. मराठी प्रवाशांसोबत बोलताना टॅक्सी चालकाला मराठी भाषा आली तर सोयीस्कर होईल. तसेच राज्य सरकार शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही. त्यांना जे आवश्यक आहे ते या आधी करून दिले आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही सामंत यांनी म्हटले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडीत काय होते ते ठरू द्या. आम्ही सज्ज आहोत. तसेच पुढे बोलताना तापमान वाढीवर सामंत म्हणाले, यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्ट सोबत चर्चा करून काजू आणि आंबा पिकावर बदलत्या हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.
