मालेगाव 2006 स्फोटातील चौघे निर्दोष:4 स्फोट, 31 बळी… पुरावेदेण्यात एनआयएला अपयश
![]()
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 8 सप्टेंबर 2006 मध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणातील चारही आरोपींना दहशतवादासह (यूएपीए) सर्व आरोपांतून दोषमुक्त केले आहे. तब्बल 19 वर्षांनंतर आलेल्या या निकालामुळे 31 निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या या साखळी स्फोटांसाठी नेमके जबाबदार कोण? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राजेंद्र चौधरी, धान सिंह, मनोहर नरवरिया आणि लोकेश शर्मा या आरोपींवर खून, गुन्हेगारी कट रचणे आणि ‘यूएपीए’ या कठोर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. त्याला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीदरम्यान अपुरे पुरावे सादर केले गेले तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सुनावणीदरम्यान एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करता आला नाही. या आधारावर खंडपीठाने चौघांना आरोपांतून मुक्त केले. बडा कब्रस्तान, मशिदीजवळ झाले होते स्फोट मालेगाव शहरात शब – ए – बारातच्या दिवशी 8 सप्टेंबर 2006 रोजी दुपारी 1.45 वाजेदरम्यान बडा कब्रस्तान व हमीदिया मशिदीजवळ नमाज संपत असताना सलग चार स्फोट झाले होते. हल्लेखोरांनी सायकलींवर बॉम्ब ठेवले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर 312 जण गंभीर जखमी झाले होते. निकालास सुप्रीम कोर्टात आव्हान देणार 2008 बॉम्बस्फोटाच्या निकालास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जमियतच्या वरिष्ठ वकिलांच्या समितीशी चर्चा करुन 2006 च्या स्फोटांबाबतच्या या निकालाविरोधातही सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. – ॲड. शाहिद नदीम, जमियतचे वकील. पुराव्यांच्या अभावामुळे आरोप निश्चितीवर प्रश्न पुराव्यांचा अभाव : ‘एनआयए’ ठोस पुरावा किंवा साक्षीदारही सादर करू शकली नाही यांची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.
दीर्घ कारावास : या चौघांना 2019 मध्येच जामीन मिळाला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, कोणताही खटला न चालता हे आरोपी 6 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत.
आरोपनिश्चितीवर सवाल: पुरावे, साक्षीदार नसल्यामुळे आरोपांची पायाभूत रचना कमकुवत ठरल्याचा मुद्दा आरोपींच्या वकिलांनी मांडला होता. यापूर्वीच इतर आरोपींची सुटका झाल्याचा संदर्भ देत हा खटला टिकू शकत नाही, असा युक्तिवाद केला. … मग बॉम्बस्फोट घडवले कुणी?- जमियत सर्वच निर्दाेष आहेत तर मालेगावात बॉम्बस्फोट कुणी घडवले असा सवाल जमियत उलमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मौलाना अब्दुल कय्युम कासमी व सचिव डॉ. अखलाख अन्सारी यांनी केला. अन्सारी म्हणाले, 2008 च्या प्रकरणासारखेच याही आरोपींची मुक्तता झाली. स्फोट घडले, निष्पाप बळी गेले. तरीही स्फोट घडवणारे निष्पन्न होत नाही हे तपास यंत्रणेचे अपयश आहे. 2008 प्रकरणात सरकारने अपील दाखल केले नाही. या खटल्यातही सरकार अपील दाखल करणार नाही.
