काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!:अकोल्यात भोंदू बाबाने चिमुकल्याला चक्क दाताने उचलून हवेत गरागरा फिरवले
![]()
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून अंधश्रद्धेचा एक मन सुन्न करणारा प्रकार उघडकीस आला आहे. चेतन सुनील मुळे नावाच्या एका भोंदू बाबाने एका निष्पाप चिमुकल्यावर अघोरी आणि जीवघेणे उपचार केल्याचा गंभीर आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदूने त्या लहान बाळाला चक्क आपल्या दातांनी उचलले आणि हवेत गरागरा फिरवले. हा अघोरी प्रकार पाहताना कोणाच्याही अंगावर शहारे येतील, इतका तो भयानक होता. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लहान मुलांच्या आजारांवर किंवा समस्यांवर उपाय शोधण्याच्या नावाखाली अशा प्रकारच्या जीवघेण्या अघोरी पद्धतींचा अवलंब होणे, हे समाजातील खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेचे विदारक चित्रण आहे. या प्रकरणातील दोषी भोंदू बाबावर प्रशासनाने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उपस्थित लोक बघ्यांच्या भूमिकेत समोर आलेल्या संतापजनक व्हिडिओमध्ये हा भोंदू बाबा एका निष्पाप बाळाला थेट दातांनी उचलून हवेत गोल गोल फिरवताना आणि धोकादायक पद्धतीने उलट-पालट करताना दिसत आहे. हे अघोरी कृत्य सुरू असताना बाळ प्रचंड रडत असूनही, तिथे उपस्थित असलेले पालक आणि इतर नागरिक अंधश्रद्धेच्या बळी ठरल्याने त्यांनी हा जीवघेणा प्रकार फक्त पाहत राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. चिमुकल्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे पालकांच्या मानसिकतेवर आणि समाजातील खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भोंदूबाबावर कठोर कारवाईची मागणी दरम्यान, हा प्रकार नेमका कशासाठी केला होता, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच हा भोंदू बाबा नेमका कोण आणि कुठला आहे याची देखील संपूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी हा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातील असल्याचे समोर आले आहे. तसेच या भोंदू बाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा नंगानाच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि समाजसुधारकांचा वारसा लाभलेल्या राज्यात अंधश्रद्धेचा असा नंगानाच सुरू असणे हे अत्यंत चिंताजनक आहे. एका बाजूला आपण विज्ञान आणि प्रगतीच्या गोष्टी करत असताना, दुसरीकडे अशा अघोरी प्रकारांमुळे चिमुकल्यांचे प्राण धोक्यात येणे हे सामाजिक जागरूकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते. या धक्कादायक घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता संबंधितांवर तातडीने आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
