निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा:ईव्हीएम पडताळणीवरून काँग्रेस नेते नसीम खान आक्रमक
![]()
मागील काही वर्षापासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, EVM मधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदवली मतदारसंघात EVM मध्ये घोटळा झाल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन तपासणीचे आदेश दिले आहेत. दिनांक १६ व १७ एप्रिलला यातील काही मशीनची तपासणी बोरीवली येथे सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नसीम खान प्रसार माध्यमांशी बोलत होते. नसीम खान पुढे म्हणाले की, न्यायालयाने डेटा सहित तपासणी करण्याचा आदेश दिला होता, तो पाळण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत आहे. निवडणूक आयोगाची SOP सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांना हरताळ फासणारी आहे. CU, BU, VVPAT फक्त जोडणी करून दाखवली. त्याला आमचा विरोध आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला पत्र देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडल्या पाहिजेत व त्याची सर्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगाचा गैरकारभार, घोटाळे यांचा पर्दाफाश केलेला आहे पण आयोग मात्र विरोधांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. हा फक्त चांदिवली विधानसभा निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर हा लोकशाही आणि निवडणुकांची निष्पक्षता व पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असेही नसीम खान म्हणाले.
