पुण्यात युवक काँग्रेसचा शेतकरी न्याय सत्याग्रह:केंद्रातल्या भाजप सरकारच्या 'किसान ट्रेड डील' विरोधात आंदोलन
![]()
पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘शेतकरी न्याय सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. भारत-अमेरिका कराराविरोधात पुकारलेल्या या सत्याग्रहाला पुणे जिल्ह्यातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारा असून, तो तात्काळ मागे न घेतल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. आंदोलनाला शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आगामी काळात हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांनी केंद्र सरकारच्या तथाकथित ‘किसान ट्रेड डील’वर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेली धोरणे शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. कर्जमाफी होत नाही, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळत नाही, परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे पुणे ग्रामीण युवक काँग्रेसच्या माध्यमातून गावागावातून युवकांना एकत्र करून हा लढा अधिक बळकट करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. ‘शेतकरी वाचवा, युवक वाचवा, भारत वाचवा’ हा नारा जनमानसात पोहोचवण्याची गरज आहे, असे पवार यांनी नमूद केले. सत्याग्रहात माजी आमदार रामहरी रुपनवर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष लहू निवंगुने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, वीरधवल गाडे, विश्वजीत जाधव, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, सौरभ अमराळे, यशवंत मोहोळ, वैभव यादव, अशोक घोलप, सौरभ रुपनवर, वैभव बुरंगुले, संकेत गवारी, राहुल जाधव आणि संदीप सातकर आदी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
