IPL 2026 | आयपीएलदरम्यान दुःखद बातमी; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे निधन
IPL 2026 | आयपीएल २०२६ दरम्यान भारतीय क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. या बातमीने सध्या क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. बीसीसीआय अध्यक्षांनी पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी शेअर केली.
देशाचे माजी कसोटीपटू चिंगलपुट दोरैक्कन्नू गोपीनाथ (C.D. Gopinath) यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले आहे. १९५२ मध्ये इंग्लंड (England) विरुद्ध भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक पहिल्या कसोटी विजयातील ते शेवटचे हयात असलेले साक्षीदार होते. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी केवळ मैदानापुरते मर्यादित न राहता निवड समितीचे अध्यक्ष आणि संघ व्यवस्थापक म्हणूनही आपली जबाबदारी चोख बजावली होती. चेन्नई (Chennai) येथील अड्यार (Adyar) भागात आपल्या मुलीच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऐतिहासिक विजयाचे शिलेदार आणि प्रभावी कारकीर्द
गोपीनाथ यांनी १९५१-५२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणि आपल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाबाद ५० आणि ४२ धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १९६० पर्यंत चाललेल्या त्यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण आठ कसोटी सामने खेळले. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा अधिक होता; त्यांनी ८३ सामन्यांमध्ये ९ शतके आणि २३ अर्धशतकांच्या मदतीने ४,२५९ धावा फटकावल्या. फलंदाजीसोबतच त्यांनी चेंडूनेही योगदान दिले असून, प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर १४ बळींची नोंद आहे.
भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देण्यात गोपीनाथ यांचा वाटा मोलाचा होता. मद्रास (Madras) येथे झालेल्या त्या संस्मरणीय सामन्यात त्यांनी फलंदाजीत ३५ धावांचे योगदान दिलेच, पण विनू मांकड (Vinu Mankad) यांच्या गोलंदाजीवर ब्रायन स्टॅथम (Brian Statham) याचा घेतलेला झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला होता. विनू मांकड यांनी त्या सामन्यात एकूण १२ बळी घेत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता, ज्यामध्ये गोपीनाथ यांच्या चपळाईची साथ लाभली होती.
Mr C.D. Gopinath represented an era when Indian cricket was beginning to establish itself on the international stage. Not only did he contribute for India, but he also played a key role in Madras’ early successes. His continued association with the game as chairman of the… pic.twitter.com/NevLKHAKv8
— MithunManhas5 (@MithunManhas) April 9, 2026
क्रिकेट जगताकडून आदरपूर्वक श्रद्धांजली
बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास (Mithun Manhas) यांनी गोपीनाथ यांच्या स्मृतींना उजाळा देत ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी नमूद केले की, गोपीनाथ हे अशा काळाचे प्रतिनिधित्व करत होते जेव्हा भारतीय क्रिकेट जागतिक नकाशावर आपली पाळेमुळे घट्ट करत होते. केवळ खेळाडू म्हणूनच नाही, तर प्रशासकीय भूमिकेतूनही त्यांनी खेळाप्रती असलेली आपली निष्ठा सिद्ध केली. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (Tamil Nadu Cricket Association) देखील त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना त्यांना ‘भारतीय क्रिकेटचे प्रणेते’ असे संबोधले आहे.
खेळाच्या इतिहासात गोपीनाथ यांचे नाव एका जिद्दी खेळाडू म्हणून कायमचे कोरले गेले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रिकेटच्या एका गौरवशाली पर्वाचा अंत झाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. भारतीय क्रिकेटमधील त्यांचे योगदान, विशेषतः तामिळनाडूच्या क्रिकेटला त्यांनी दिलेली दिशा, येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना प्रकट केल्या जात आहेत.
