कर्जत-जामखेड मध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती:343 जिल्हापरिषद शाळांना 9 कोटी 64 लाख 27 हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य
![]()
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोमवार, दिनांक 13 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता या अभियानाअंतर्गत 140 शाळांमध्ये 65 इंची इंटरऍक्टिव्ह पॅनल, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, वायरलेस कीबोर्ड व माऊस आणि ऑफलाइन यूपीएस असे शैक्षणिक साहित्य लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित राहणार आहेत. एकूण 9 कोटी 64 लाख 27 हजार रुपये इतक्या निधीचे डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कर्जत तालुक्यात एकूण शाळांची संख्या 266 असून सन 2022-2023 मध्ये 41, सन 2024-2025 मध्ये 100 आणि सन 2025-2026 मध्ये 84 अशा एकूण 225 शाळा तर जामखेड तालुक्यात एकूण शाळांची संख्या 173 असून तेथे सन 2022-2023 मध्ये 30, सन 2024-2025 मध्ये 28 आणि सन 2025-2026 मध्ये 56 अशा एकूण 114 शाळांमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये 04 याप्रमाणे एकूण 343 शाळांमध्ये डिजिटल शैक्षणिक संच वाटप करण्यात येत आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अहिल्यानगर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थीवर्ग, पालक, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. आधुनिक शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या अभियानामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण असून दृक-श्राव्य माध्यमातून अत्याधुनिक, रंजक व सुलभ शिक्षण पध्दती उपलब्ध होत आहे. शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वाढ होईल आणि विद्यार्थ्यांचा शैक्षिणिक सहभाग, आत्मविश्वास वाढण्यास हातभार लागेल. आधुनिक शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्राप्त होत असल्याने ग्रामीण आणि शहरी अशी दरी कमी होऊन स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त होईल. आजच्या या सोहळ्यात शैक्षणिक संच प्राप्त झालेल्या 140 शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक सहभागी होत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडविणारा हा उपक्रम धडाडीने राबवित असलेले विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचे त्याबद्दल अभिनंदन केले जात आहे.
