मिरा-भाईंदर हादरलं! गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी भीषण आग:3 ठार, 50 झोपड्या खाक; बेकायदेशीर सिलिंडरचा साठा उघड
![]()
मिरा-भाईंदर परिसरातील भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. सुमारे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आग पसरत गेली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीदरम्यान एकामागोमाग तीन गॅस सिलिंडरचे जोरदार स्फोट झाले. या स्फोटांमुळे आगीची तीव्रता वाढत गेली आणि अवघ्या काही वेळातच सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापल्याने रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उत्तर प्रदेशचे गुड्डू राम (वय 46), तसेच पश्चिम बंगालमधील सुरज लियाकत अली मंडळ (वय 14) आणि रोहित रहेमत अली मंडळ (वय 15) यांचा समावेश आहे. हे तिघेही आगीत होरपळून मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. 24 बेकायदेशीर गॅस सिलिंडरचा साठा घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. आग विझल्यानंतर तपासादरम्यान परिसरातून 24 बेकायदेशीर गॅस सिलिंडरचा साठा आढळून आला. हा साठा नेमका कोणी आणि कशासाठी केला होता, याचा तपास सध्या सुरू असून पोलिसांनी सिलेंडर जप्त केले आहेत.
