पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा रोखल्याने तणाव:आमदार गोपीचंद पडळकर आपल्या भूमिकेवर ठाम; पोलिसांचा कडक बंदोबस्त
![]()
पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ पोलिसांनी मधेच रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे. या मोर्चाअंतर्गत आयोजित केलेली बाईक रॅली खडी मशीन चौकापर्यंत जाणार होती आणि तिथे गोपीचंद पडळकर यांची सभा होणार होती. मात्र पोलिसांनी ही रॅली नियोजित स्थळापूर्वीच अडवल्याने गेल्या दीड तासांपासून आमदार पडळकर आणि संग्राम जगताप पुढे जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आज पहाटेपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शिवतीर्थ सासवड येथून निघालेली ही भव्य बाईक रॅली कोंढव्यातील खडीमशीन चौकापर्यंत जाणार होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक सहभागी झाले असून, मार्गावर तैनात असलेल्या मोठ्या पोलीस फौजफाट्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कोंढव्यातील संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून कोंढव्यातील संबंधित संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच भिवरी ग्रामस्थांवर दाखल केलेले कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आक्रमक मागणी करण्यात येत आहे. या मागण्यांसह पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणातील अन्यायावरही या आंदोलनाद्वारे भूमिका मांडली जाणार आहे. बापदेव घाट प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर खडी मशीन चौकात सभा घेण्यासाठी आक्रमक झाले असून पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. बापदेव घाटात घडलेल्या मारहाण प्रकरणानंतर ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊन कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. याशिवाय, पुण्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी या सभेचे नियोजन करण्यात आले होते. कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात दुसरीकडे, खडी मशीन चौक परिसरात अन्य धर्मीय नागरिकही जमायला लागल्याने संभाव्य संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोपीचंद पडळकर नियोजित स्थळी पोहोचल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, ही भीती लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे. कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण परिसरात सध्या कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
