मध्य शहरात पाणीपुरवठा विस्कळीत:40 वर्षे जुन्या जलवाहिनीला गळती; उपनगरात निर्जळी, "अमृत'ने तारले
![]()
अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४० वर्षे जुन्या ११०० एमएम व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला नांदगाव शिवारात मंगळवारी सकाळी मोठी गळती लागल्याने काल उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा पाणी उपसा सुरू केला. सुमारे दहा ते बारा तास पाणी उपसा बंद राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, अमृत योजनेतील नव्या जलवाहिनीमुळे शहराच्या उर्वरित भागात नियमित पाणीपुरवठा करण्यात आला. नांदगाव शिवारातील देवनदीजवळ जाधव यांच्या शेतामध्ये हवेच्या आणि पाण्याच्या दाबाने जलवाहिनीच्या जॉईंटला गळती लागली. यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने मुळानगर येथून होणारा पाणी उपसा तातडीने थांबवण्यात आला. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या निर्धारित वेळेत पूर्ण क्षमतेने भरता आल्या नाहीत. परिणामी, बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईप लाईन रोड, ढवणवस्ती परिसर आणि वैदूवाडी या भागास पाणी पुरवठा होऊ शकला नाही. या भागाला आज (बुधवारी) पाणी दिले जाणार आहे. महापालिकेने मंगळवारी सायंकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले. पाणी वितरणाच्या टाक्या भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दहा तासांपेक्षा अधिक काळ उपसा बंद राहिल्याने, आज शहर व उपनगरात उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. शहरातील या भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत आज रोटेशननुसार पाणीवाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात पाणीपुरवठा विस्कळीत राहील.
