नांदेडची शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा-रविकांत गायकवाड
मुरलीधर थोटे.
नांदेडचे बिहार होवू देऊ नका, पोलिस अधिक्षकांकडे मागणी
नांदेड – नांदेड जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था बिघडली असून गेल्या तीन दिवसात 5 खून नांदेड शहरात झाले असून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती झाली. सदरील खूनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र नांदेडचे जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ईस्क्वेअर परिसरातील तिहेरी खून प्रकरणामुळे नांदेड अगोदरच दहशतीच्या वातावरण होते. नांदेडच्या विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात सर्वांसमोर एकाचा शस्त्राचे वार करून खून करण्यात आला. यामुळे रूग्णालयातील सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे यावरूनच दिसून येते. त्यातच काल मुरमुरा मार्केट परिसर व आज श्रीनगर नांदेड भागात सकाळी पहाटे एकाचा निघृण खून करण्यात आला. या तीनही घटना ह्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून अशा गुन्हेगारांना पोलिस प्रशासनाने तात्काळ अटक करून कायद्याची वचक दाखवणे गरजेचे आहे. नांदेडची अवस्था बिहारच्या गुन्हेगारी सारखी बनत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास नांदेडचे बिहार होण्यास वेळ लागणार नाही.
नांदेड शहरात दिवसा व रात्रीला पोलिस गस्त शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर लावण्यात यावी जेणे करून गुन्हेगारांना धास्ती बसेल. नांदेडचे पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार हे शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून त्यांनी तात्काळ उपाययोजना करून नांदेडकरांना सुरक्षित ठेवावे, अशी मागणी लोकश्रेय मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
