अजितदादांच्या अपघाताशी भोंदू खरातचा संबंध?:अपघाताच्या 1 दिवस अगोदर, अपघाताच्या दिवशी, अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मोठा आर्थिक व्यवहार
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाले होते. खरातचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून झालेला प्रवास व त्याचे अनुयायी पाहता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? हा संशय अधिक गडद होतो, असे ते म्हणालेत. अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले होते. तत्पूर्वी, त्यांच्या घराबाहेर कथितपणे काळी जादू झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. आमदार रोहित पवार या प्रकरणी वारंवार संशय व्यक्त करत काही सत्ताधारी नेत्यांवर संशय व्यक्त करत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रात एफआयआर दाखल करण्यात अपयश आल्यानंतर त्यांनी थेट कर्नाटकात जाऊन एफआयआर दाखल केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका विधानाचा दाखला देत उपरोक्त आरोप केला आहे. रोहित पवार नेमके काय म्हणाले? रोहित पवार आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा, असे ते म्हणाले. आता पाहू काय म्हणाल्या अंजली दमानिया? अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, समता नावाची एक पतसंस्था आहे. त्यात पैसे टाकले किंवा काढले की एसएमएस येतो. मी या संस्थेची पूर्ण माहिती काढली आहे. त्यात मला अनेक गोष्टी समजल्या. 27 जानेवारी रोजी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी, खरातच्या समता पतसंस्थेच्या खात्याचे 17 मेसेज आले होते. तद्नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी (28 जानेवारी) 19 मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी 10, 30 जानेवारी 8, तर 31 जानेवारी रोजी 8 मेसेज आलेत. या व्यवहाराची मी एसआयटीकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहेत, असे दमानिया यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… बिनविरोध निवडणूक हे भाजपचे सोयीचे राजकारण:काँग्रेसने वसंतराव चव्हाण अन् भालकेंच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीचा दिला दाखला काँग्रेसने बिनविरोध निवडणूक करणे हे भाजपच्या सोयीचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर शरसंधान साधताना खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भारत भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप बिनविरोध निवडणूक करण्याच्या मुद्यावर केवळ आपल्या सोयीने राजकारण करतो, असे काँग्रेसने म्हटले आहे. वाचा सविस्तर
