निवडणूक झालीच तर निकाल एकतर्फी:एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला थेट इशारा; सुनेत्रा पवार यांच्या कामांचाही उल्लेख
![]()
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महायुतीची भूमिका होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लढवावी लागत आहे. या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली होती. त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. विशेषतः अर्थ खात्याचे काम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने हाताळले. ‘लाडकी बहीण’ योजनेचा निर्णय घेताना देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे शिंदे यांनी नमूद केले. एक सक्षम प्रशासक आणि संघटक म्हणून अजित पवारांची ओळख होती, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कामाचाही उल्लेख केला. अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांनी सक्षमपणे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील कारभार पुढे नेण्यासाठी त्या आणि महायुतीतील नेते एकत्रितपणे काम करत आहेत, असे शिंदे म्हणाले. बारामतीतील विकासकामांची त्यांना चांगली जाण असून, स्थानिक जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. पुढे बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, अनेक सामाजिक संघटनांनी देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु, आता निवडणूक झाल्यास त्याचा निकाल जनतेच्या मतांमधून स्पष्ट दिसेल, असे ते म्हणाले. विरोधकांनी परंपरा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा शेवटी शिंदे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा देताना म्हटले की, जर बारामतीत निवडणूक झालीच, तर अजित पवारांनी केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील. आणि त्या मतांमधून सुनेत्रा पवार यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
