शरद पवारांनी घेतली राज्यसभेत खसदारकीची शपथ:रोहित पवार म्हणाले- देशातील सर्वात तरुण लोकनेता; पवारांच्या तीन पिढ्या संसदेत
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या 59 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी संसदीय कारकिर्दीचा टप्पा गाठल्यानंतर तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच ही शपथ ग्रहण केली. विशेष म्हणजे शरद पवारांच्या या निवडीमुळे आता पवार कुटुंबातील तीन पिढ्या एकाच वेळी संसदेत कार्यरत असल्याचे ऐतिहासिक चित्र पाहायला मिळणार आहे. याचसोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील शपथ घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा व्हिडिओ ट्विट करत ‘देशातील सर्वात तरुण लोकनेता’ असे वर्णन केले आहे. महाराष्ट्रातून माया ईवाते (भाजप), रामराव वाडकुटे (भाजप), ज्योती वाघमारे (शिवसेना) यांनी देखील आज शपथ घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आता अधिकृतपणे राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत प्रवेश करणार असून, 10 एप्रिल रोजी त्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार यांची पहिल्यांदाच राज्यसभेवर वर्णी लागली असून, ते 9 एप्रिल रोजी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतील. या दोन्ही नेत्यांच्या संसदेतील एन्ट्रीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व आता देशपातळीवर अधिक प्रबळ होताना दिसत आहे. शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरील चारही सभागृहांचे सदस्यपद भूषवण्याचा बहुमान मिळवला असून, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाची सुरुवात 1967 मध्ये पहिल्या आमदारकीच्या विजयाने झाली. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या पवारांनी 1968 मध्ये पहिल्यांदा राज्याची धुरा सांभाळली, तर 1984 मध्ये बारामतीतून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर 1985 मध्ये ते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात परतले. राज्यासोबतच केंद्रातही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवत त्यांनी भारतीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 1990 पर्यंत सलग सहा वेळा बारामतीचे आमदार राहिलेल्या शरद पवारांनी 1991 ते 2014 या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आणि 2014 पासून ते राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात, 1998-99 मध्ये लोकसभा बरखास्त झाल्याचा अल्प काळ वगळता, ते सातत्याने राज्याच्या किंवा देशाच्या कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सक्रिय सदस्य राहिले असून, आता पुन्हा एकदा राज्यसभेची शपथ घेतल्याने त्यांचा हा ऐतिहासिक संसदीय कार्यकाळ 2032 पर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.
