दमानियांचा 'नॉनसेन्स' म्हणत सुषमा अंधारेंवर हल्ला:भोंदू अशोक खरातच्या CDR प्रकरणी होणारे आरोप फेटाळले; PC मध्ये भावूक
![]()
अशोक खरातचे कॉल डिटेल्स (CDR) सार्वजनिक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दमानिया यांच्यावर टीका केली होती. आज पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, खरातच्या सोबत जेवढ्या लोकांचे फोटो आहेत, त्या सगळ्यांचे नंबर मी शोधले. इतकेच नाही तर मला माहीत होते की सगळ्यांचे माझ्यावर आरोप होतील. म्हणून सुरुवातीपासून कोणाकोणाचे शोध घेतले त्याचा सीडीआरचे जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी देणार आहे. नॉनसेन्स! म्हणत सुषमा अंधारेंवर निशाणा पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांचा एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकही कॉल नाही. अब्दुल सत्तार एकही कॉल नाही, रामदास कदम नाही, योगेश कदम नाही, राधाकृष्ण विखे पाटील नाही, संजय राऊत नाही, राम कदम नाही, बच्चू कडू नाही, मोहित कंबोज नाही, गिरीश महाजन नाही. ज्यांचे नंबर मिळाले नाहीत त्यांना क्रॉस केले. आणि ज्यांचे मिळाले ते समोर आणले लगेच आरोप केले की यात भाजपचा एकही नाही. जो उठेल तो बोलतो. नॉनसेन्स! आम्ही लढतो विषयांवर, फालतूचे राजकारण करत नाही आम्ही, असे म्हणत दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला. खड्ड्यात गेले तुमचे विचार अंजली दमानिया म्हणाल्या, मी बोलते तर मी सिलेक्टीव्ह. तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले. केली तुम्ही चौकशी? मागणी केली त्यांच्या चौकशीची? काय बोलता अंधारे बाई तुम्ही? असे म्हणत दमानिया यांनी सुषमा अंदगरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमचा विषय काय? लढायचे आहे कोणाच्या विरोधात? खरातच्या विरोधात. मी फक्त माझ्याकडे आलेली माहिती दिली. तर लगेच वर खाली व्हायला लागल्या. दमानिया बाई अमुक, दमानिया बाई तमुक. त्यांनी हे नाही केले, ते नाही केले. खड्ड्यात गेले तुमचे विचार, तुमच्या खिशात ठेवा, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सगळे राजकारणी अशा भोंदू लोकांना प्रोटेक्ट करतात पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांचे एवढे फोन कॉल्स समोर आले आहेत. सुनील तटकरे यांचे सुद्धा अनेक कॉल्स समोर आले आहेत. अंधारे बाई ऐका जी समरी येते, त्यात इनकमिंग कॉल्स किती, किती वेळ बोलणे झाले ते सगळे येते. शिवसेनेचे शिंदे यांचे 17 कॉल आले आहेत. संजय शिरसाट यांचे कॉल्स मिळाले. त्यानंतर काल मुंबईकडे येताना प्रभाकर काळे जे एकनाथ शिंदे यांचे पीए आहेत, त्यांच्याकडून एका नंबरवरून 11 कॉल आणि दुसऱ्या नंबरवरून एक कॉल असे करण्यात आले आहेत. माझा राग या गोष्टीवर आहे की या सगळे राजकारणी अशा भोंदू लोकांना प्रोटेक्ट करतात. त्यांना विचारले पाहिजे की तुम्ही एवढे कॉल त्याला का केले? अशी मागणी दमानिया यांनी केली. अशोक खरात प्रकरणी धक्कादायक माहिती उघड आता अतिशय गंभीर विषय आहे. समता नावाची पतसंथा आहे. त्यात पैसे टाकले किंवा काढले की एसएमएस येतो. माझ्याकडे सीडीआर कुठून आला ते शोधू दे त्यांना. समता नावाची पतसंस्था ज्याची आता चौकशी सुरू आहे. त्याचे पूर्ण वेळात 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी एक मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे महिन्याचे. असे मी पूर्ण काढले. पण आता महत्त्वाची बातमी ऐका. 27 जानेवारी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी, 17 मेसेज होते समताचे. 28 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 29 जानेवारी – 10 मेसेज. 30 जानेवारी 8 मेसेज, 31 जानेवारी – 8 मेसेज. हे दिवसाचे आहेत. म्हणजे यात काय झाले, हे एसआयटीकडे नेऊन तपासची मागणी करणार आहे.
