‘कालचा इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’:‘मिमिक्री करणं सोपं, यातून काय साध्य होणार?’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

[ads1]


काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित केलेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी, रोजगार, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मात्र, कार्यक्रमादरम्यान स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या शैलीची केलेली नक्कल चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. या घटनेवरून भाजपकडून राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधींच्या इंदूरमधील कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली. पटेल यांनी या कार्यक्रमातील मिमिक्रीवर आक्षेप घेत, राजकीय कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींपेक्षा देशातील गंभीर प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ‘मिमिक्री करणं सोपं, पण यातून काय साध्य होणार?’ इंदूरमधील कार्यक्रमाबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी त्याला ‘बालिशपणाचा’ कार्यक्रम असल्याचे म्हटले. एखाद्या नेत्याची मिमिक्री करणे तुलनेने सोपे असते; मात्र त्यातून देशातील प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकीय नेत्यांनी देशाच्या विकासासाठी आणि जनतेच्या समस्यांच्या निराकरणासाठी काम करणे अपेक्षित असल्याचे पटेल म्हणाले. राजकीय मतभेद असले तरी त्यासाठी केवळ एकमेकांची खिल्ली उडवण्याऐवजी गंभीर मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. इंदूरच्या कार्यक्रमात पुलकित मणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परदेशी नेत्यांशी संवाद साधण्याच्या शैलीपासून त्यांच्या काही सार्वजनिक कार्यक्रमांतील हावभावांपर्यंत विविध गोष्टींची नक्कल केली. या सादरीकरणादरम्यान राहुल गांधी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमातील या भागाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आणि त्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पंतप्रधानांच्या आईच्या उल्लेखावरूनही वाद मिमिक्रीच्या सादरीकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईशी संबंधित उल्लेख करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या भागावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला. भाजप नेत्यांनी राहुल गांधी कार्यक्रमात उपस्थित असताना या सादरीकरणाला प्रतिसाद दिल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमातील या घटनेनंतर दोन्ही पक्षांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम मिमिक्रीच्या मुद्द्यामुळे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवरही पटेलांची भूमिका मुलाखतीदरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीवरही भाष्य केले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. काही भागांत पेरण्या झाल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाअभावी शेतीबरोबरच आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे पटेल म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थितीबाबत सरकार आवश्यक ती कार्यवाही सुरू करत असल्याचे सांगितल्याचा संदर्भ पटेल यांनी दिला. शेतकरी आणि सामान्य नागरिकांना या परिस्थितीत मदत मिळावी, यासाठी सरकारने वेळीच निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळावर विशेष अधिवेशनाच्या मागणीवर काय म्हणाले? महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात बोलताना पटेल यांनी पावसाची कमतरता आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी ही गंभीर बाब असल्याचे मान्य केले. मात्र, सरकारने परिस्थितीवर तातडीने निर्णय घेऊन शेतकरी, पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नांवर उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. UPI व्यवहारांवरील शुल्काबाबतही भाष्य मुलाखतीत UPI व्यवहारांशी संबंधित शुल्काच्या मुद्द्यावरही प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका मांडली. UPI च्या MDR अर्थात मर्चंट डिस्काउंट रेटबाबत यापूर्वीही अनेकदा चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. संसदीय समितीच्या पातळीवरही या विषयावर माहिती देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्या वेळी विरोधकांकडून विशेष सूचना करण्यात आल्या नसल्याचेही पटेल यांनी नमूद केले.लमात्र, या विषयावर सरकार संवेदनशील असून नागरिक आणि छोट्या व्यापाऱ्यांवर त्याचा अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांचे प्रमाण एकूण व्यवहारांच्या तुलनेत फार मोठे नाही. त्यामुळे सामान्य ग्राहक किंवा छोट्या व्यापाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसू नये, यासाठी सरकारने परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हेही वाचा… राहुल गांधींनी स्टँडअप कॉमेडियन बनावे:तिथे मिमिक्री केल्यास किमान रोजगार तरी मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील अवाडा (Avaada) सोलर प्रकल्पाला भेट दिल्यानंतर विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीवर टीका करताना, नागपुरातील उद्योगवाढ, अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रांची उभारणी, मुंबईतील पायाभूत सुविधा, समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित फ्रेट कॉरिडोर तसेच UPI व्यवहारांवरील शुल्क या मुद्द्यांवरही सविस्तर भूमिका मांडली. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *