'मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझे जीवन संपवत आहे':लातूरमध्ये युवकाची आत्महत्या? मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्तारोको

[ads1]


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात एका युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथे सुनील विनायक बिराजदार (वय 42) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझे जीवन संपवत आहे’, असा मजकूर असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी विहिरीजवळ गर्दी केली. गावकऱ्यांनी विहिरीत शोध घेतल्यानंतर सुनील बिराजदार यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्तारोको सुनील बिराजदार यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईक आणि मराठा समाजातील आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. मृतदेह उदगीर-लातूर महामार्गावरील येरोळमोड येथे आणून रस्त्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे उदगीर-लातूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अचानक वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आंदोलकांच्या दोन प्रमुख मागण्या आंदोलकांनी प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. सुनील बिराजदार यांच्या कुटुंबातील एका सदस्याला तातडीने शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि त्याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी पहिली मागणी आहे. तसेच मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावर सरकारने लेखी निर्णय द्यावा, अशी दुसरी मागणी आंदोलकांनी केली आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका नातेवाईक आणि आंदोलकांनी घेतली आहे. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी रास्तारोकोची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आंदोलक आणि मृताच्या नातेवाईकांशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिरूर अनंतपाळ परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळण्याची मागणी केली जात आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर घटना मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला मंगळवारी 11 दिवस झाले आहेत. या काळात सरकारच्या शिष्टमंडळाने आणि अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. मागण्यांच्या अंमलबजावणीचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, सरकारकडून समाधानकारक निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. 58 लाख कुणबी नोंदी प्रसिद्ध करण्याचा निर्णय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने शोधलेल्या सुमारे 58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे आयोजित करून संबंधित नागरिकांना आवश्यक प्रक्रिया आणि कागदपत्रांबाबत मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. लातूरमध्ये सुनील बिराजदार यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईक आणि आंदोलकांचा दावा आहे. या घटनेनंतर रास्तारोको करण्यात आल्याने उदगीर-लातूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासन आणि आंदोलकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून काय तोडगा निघतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. ’15 पैकी 12 मागण्या मान्य, याला न्याय देणे म्हणत नाहीत’:मनोज जरांगे संतापले; एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्यांनाही दिला इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 11 दिवस आहे. मंत्री उदय सामंत यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली. तसेच सरकार सकारात्मक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मात्र तरी देखील जरांगे यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना ज्या भाषेचा वापर केला त्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर जरांगे यांनी पलटवार केला आहे. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *